भवानीनगर – राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाने इंदापूर-बारामती रस्त्यावर 35 किलोमीटरच्या अंतरामधील रस्त्यावरील खड्डे भरले असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इंदापूर ते बारामती रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सोलापूर विभागाची तत्परता बारामती आत्मसात करणार का, असा प्रश्न आता वाहनचालक करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाचे शाखा अभियंता आर. बी. पांढरे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, उपअभियंता भास्कर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाई डेअरी ते काटेवाडी येथील पुलापर्यंत 35 किलोमीटर रस्त्यावरील पडलेले खड्डे बुजविले आहेत. पावसाळा संपताच या 35 किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता पांढरे यांनी दिली.
सोलापूर विभागाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या व मंजूर झालेल्या 35 किलोमीटरचे काम या विभागाने पूर्ण केले आहे. परंतु काटेवाडी येथील बसस्थानकापासून ते भवानीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. हे खड्डे कोणत्या विभागाच्या हद्दीत येतात, त्या विभागाने तातडीने बुजवणे गरजेचे आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे कायम अपघात होत आहेत. त्यामुळे हद्दीच्या तत्पर कामांची तुलना आता वाहनचालक व नागरिकांमधून होत आहे.