केतकावळे -सीताफळाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील सीताफळ उत्पादक शेतकरी लॉकडाऊनमुळे तिहेरी कात्रीत सापडला आहे. भाव, ग्राहक, बाजारपेठ नसल्याने तो आर्थिक विवंचनेत सापडला असून घर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला आहे.
पुरंदर तालुक्यात सरासरी 12 हजार एकर क्षेत्रांमध्ये सीताफळाचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळी आणि पावसाळी, असे दोन बहार शेतकरी घेतात. हा माल पुणे, मुंबईसह इतर राज्यांत तर देशाबाहेरही विक्रीसाठी पाठवला जातो. त्यामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्याला चांगला फायदा होतो.
मात्र, यंदा मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हापासून ते आतापर्यंत सीताफळ उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. दरम्यान, हाती दोन पैसे मिळावे म्हणून शेतकरी रस्त्याच्या बाजूला बसून सीताफळ विकत आहे.
पुरंदर तालुक्यातील शेतकरी फळबागा मोठ्या प्रमाणात करत असून सध्या सीताफळांचा सिझन सुरू झाला आहे; परंतु मोठ्या शेतकऱ्यांना कामगार मिळत नसल्याने फळे झाडांवरच पिकून गळत आहेत. जर तोडली तर बाजारपेठ उपलब्ध होत नाही.
तर करोनामुळे कोणी घराबाहेर पडत नसल्याने त्याची विक्रीही होत नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे, अशी माहिती दिवे गावचे शेतकरी तथा माजी कृषी व सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांनी दिली.
सीताफळाच्या या शेतीतून दरवर्षी 15 ते 20 कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदा उत्पादकांची वाट अत्यंत बिकट झाली असून जगण्यासाठीचे तरी पैसे निघणार की नाही, असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला आहे.
1500 च्या मालाची 800 रुपयांत विक्री
दरवर्षी जे क्रेट 1500 ते 2500 रुपये बाजारभावाने विक्री होत असते ते यावेळी 800ते 1200 रुपयांना द्यावे लागते. दरवर्षी सीताफळ बाहेर पाठविण्यात येते तेव्हा बाजारभाव मिळतो; परंतु या वर्षी जगावरच मोठे संकट आल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी पल्प काढण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होती; परंतु त्यासही मागणी नसल्याने ती दोन वर्षांपासून बंद असल्याने सीताफळ व इतर फळे घेणारा शेतकरी सध्यातरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे.
– दादासाहेब जगताप, शेतकरी तथा शिवजन प्रतिष्ठान अध्यक्ष, सुपे