मुंबई – करोना महामारीत राज्यातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधल झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ होणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
याबाबतची घोषणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, करोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळेल.
चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी दरवर्षी वेगळी घोषणा करण्याची आवश्यकता नाही. पदवी आणि पदविका शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची फी सरकार भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.