नवी दिल्ली – हिंसाचारग्रस्त मणिपुरमध्ये अद्यापही हजारो विस्थापित नागरीक मदत छावण्यांमध्येच राहात असून त्यांच्यासाठी तेथेच मतदानाची व्यवस्था केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, प्रदीप कुमार झा म्हणाले की, २४५०० हून अधिक विस्थापित लोक आगामी निवडणुकीत मतदान करण्यास पात्र म्हणून ओळखले गेले आहेत आणि त्यांच्यासाठी मदत शिबिरांमधेच मतदान करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २९५५ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत, त्यापैकी सुमारे५० टक्के संवेदनशील, असुरक्षित किंवा गंभीर म्हणून ओळखली गेली आहेत. आम्ही मतदानाच्या सोयीसाठी ९४ विशेष मतदान केंद्रे देखील स्थापन करत आहोत. त्या अंतर्गत विस्थापित व्यक्ती तेथे मतदान करू शकतील असे झा यांनी पीटीआयला सांगितले.
मणिपुर मध्ये मेईतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ डोंगराळ जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकता मार्च आयोजित केल्यानंतर गेल्या वर्षी ३ मे रोजी सुरू झालेल्या जातीय संघर्षात किमान २१९ लोक ठार झाले आहेत.५० हजारांपेक्षा जास्त विस्थापित लोक सध्या पाच जिल्हे आणि तीन डोंगराळ जिल्ह्यांमधील मदत केंद्रांमध्ये राहत आहेत.