स्त्रीशक्तीचे मतदान मिळविण्यासाठी उमेदवार सरसावले
नगर – लोकसभा निवडणुकीत उमेदवारांसाठी मतदारांतील कोणता घटक महत्त्वाचा ठरणार, याची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारांना संसदेपर्यंत जाण्यासाठी जशी तरुण मतदारांची आवश्यकता आहे, अगदी तशीच महिला मतदारांचे मतदानही महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या चार लोकसभा निवडणुकींचा अपवाद वगळता, पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी मतदानाचा हक्क बजाविल्याने स्त्री शक्ती’चे मत मिळविण्यासाठी उमेदवारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ऐन रंगात असताना, मतदारांतील कोणता घटक उमेदवारांना तारणार, याचीही चर्चा होताना दिसत आहे.
प्रत्यक्ष मतदानादिवशी पुरुषांपेक्षाही महिलांचा उत्साह अधिक दिसून आला आहे. मतदार यादीनुसार नगर मतदारसंघात 18 लाख 61 हजार 396 मतदार आहेत. यात 8 लाख 83 हजार 601 महिला मतदार आहेत. मतदारसंघातील महिला मतदारांचा टक्का मोठा असला तरी, महिलांच्या प्रश्नांवर अद्यापही उपाययोजना दिसून येत नाहीत. जिल्ह्याचा पूर्वभाग सध्या दुष्काळाने होरपळून निघत असून, पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे. या पार्श्वभूमीवर पाण्यासाठी महिला वर्गाला मैलो न मैल भटकंती करावी लागत आहे.
40% चाळिशीच्या आतील मतदारांवर जशी उमेदवारांची मदार असणार आहे, अगदी तशीच महिलांच्या मतांवरही भिस्त राहील.48% मतदार महिला असून, पुरुषांच्या जवळपास बरोबरीची संख्या आहे. त्यांच्या मतदानाचा टक्काही वाढत आहे. 55% ही गेल्या चार निवडणुकांमधील महिला मतदानाची सरासरी टक्केवारी आहे. पुरुषांपेक्षा ही टक्केवारी कमी असली तरी, ती निर्णायक ठरणारी आहे.