पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मागील अडीच महिन्यांत मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव वगळणे, पत्ता बदल आदींसाठी एकूण 2 लाख 36 हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. या सर्व अर्जांवर जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठीचे आहेत. या अर्जांची संख्या 1लाख 54 हजार इतकी आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदार यादी अद्यावत करण्याची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये मतदारांच्या नाव, पत्यांमधील दुरुस्ती, दुबार नावे वगळण्याबरोबरच नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. महाविद्यालयांमध्ये मतदार नाव नोंदविण्यासाठी मोहीम राबविली होती. तसेच फेब्रुवारी आणि मार्चमध्ये विशेष मोहीम राबविली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुक शाखेने दि.23 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली तरी नवीन नाव नोंदविणे, नावातील दुरुस्ती, नाव वगळणे आदी अर्जांबाबत कार्यवाही केली जाते. नवीन मतदार नोंदणीसाठी आलेले अर्जांचा समावेश मतदार यादीत करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण ८२ लाख २४ हजार ४२३ मतदार आहेत. आता त्यात आणखी भर पडणार आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज – 1,54,241
मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी आलेले अर्ज- 19,255
दुरुस्तीसाठी आलेले अर्ज – 62,635