करोनाबाबत भीती आणि गैरसमज
पुणे – करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्यानेही संसर्ग होऊ शकतो, या भीतीने तसेच याबाबत अनेक गैरसमज नागरिकांमध्ये आहेत. त्यामुळे अनेक नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास अथवा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास पुढे येत नसल्याचे सामोर आले आहे. त्यामुळे तो मृतदेह घेऊन, त्यावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी स्वयंसेवकांवर येऊन पडली आहे. मुळात नातेवाईकांमध्ये असलेली भीती आणि गैरसमज दूर करणे आवश्यक आहे, त्याबाबत तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.
करोना आजार श्वसनसंस्थेचा आहे. लागण झालेल्या व्यक्तीचे शिकणे, खोकणे, बोलणे, थुंकणे या क्रियांमधून हा विषाणू बाहेर फेकला जातो. पण, मृत्यूनंतर हा सर्व प्रसार थांबतो. मृतदेहाच्या अंगावर आणि त्याच्या स्त्रावात असलेल्या विषाणूपासून दूर राहणे एवढीच काळजी घ्यायची गरज असते. हे विषाणू आपणहून उडून पसरत नाहीत. त्यामुळे मृतदेहाला किंवा त्याच्या नाका-तोंडातून स्त्राव आला असेल तर हातमोजे घातल्याशिवाय त्याला स्पर्श करायचा नाही एवढीच काळजी घ्यायला हवी, अशी सूचना पूना सिटीझन डॉक्टर फोरमच्यावतीने करण्यात आली.
रुग्णालयात मरण पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापूर्वी काय काळजी घ्यावी या संदर्भात मुख्यत: आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि आप्तेष्टांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही सूचना जारी केल्या आहेत. मृतदेहाबरोबर नातेवाईकांनी शववाहिकेतून प्रवास करणे, हातमोजे घालून मृतदेह उचलणे, मृतदेहाला स्पर्श न करता अंत्यसंस्कार करणे याला हरकत नाही.
मृतदेहाला स्पर्श न करता मृत व्यक्तीचे दर्शन घेण्याने, स्मशानभूमीत गेल्याने, लागण होण्याची शक्यता नाही. अशावेळी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात घालतात तसा संरक्षक पोशाख घालण्याची गरज नाही, असे डॉ. विनय कुलकर्णी, डॉ. अनंत फडके यांनी सांगितले.