नवी दिल्ली : आयुष्यात एकदातरी परदेशात जावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र दरवेळी तुम्ही व्हिसा, पासपोर्ट आणि मोठ्या खर्चाचा विचार करून तुमची योजना गुंडाळता ? जर होय, तर यावेळी आम्ही तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. या बातमीत आम्ही अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी पैशात प्रवासाचा पूर्ण आनंद घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे प्रवास करण्यासाठी तुम्हाला व्हिसाची गरज भासणार नाही.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्या साजरे करण्यासाठी तुम्ही या देशांमध्ये सहलीची योजना देखील करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय पासपोर्टधारकांनाही येथे चांगली वागणूक दिली जाते. होय, आता तुम्ही व्हिसाची चिंता न करता काही सुंदर देशांना भेट देऊ शकता. या देशांमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला फक्त सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र आणि काही देशांसाठी भारतीय पासपोर्ट आवश्यक आहे. चला अशाच चार अतिशय सुंदर देशांबद्दल जाणून घेऊया, जिथे प्रवास तुमच्यासाठी नेहमीच अविस्मरणीय असू शकतो. आपल्या शेजारी देशापासून सुरुवात करूया.
* नेपाळ
नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे, जिथे भारतीय लोकांना प्रवास करण्यासाठी व्हिसा किंवा पासपोर्टची आवश्यकता नाही. तुम्ही फोटोसोबत फक्त एक वैध ओळखपत्र सोबत बाळगावे. नेपाळ हा पर्वतांनी वेढलेला निसर्गसौंदर्य असलेला एक सुंदर देश आहे, तो ट्रेकर्ससाठी स्वर्ग मानला जातो. येथील डोंगररांगांमध्ये ट्रेकिंगसाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. येथे तुम्हाला भारतीय संस्कृतीही पाहायला मिळेल.
* हाँगकाँग
फार कमी लोकांना माहित आहे की हाँगकाँग भारतीय पासपोर्ट धारकांना 14 दिवसांचा व्हिसा फ्री मुक्काम देते. तुम्हाला फक्त भारतातून थेट हाँगकाँगला जावे लागेल. हाँगकाँग आशियातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे, येथे तुम्ही शहराच्या नाइटलाइफ आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. भारतातील जवळपास सर्व प्रमुख विमानतळांवरून हाँगकाँगला थेट उड्डाणे आहेत.
* भूतान
भूतान आपल्या पर्यटकांचे मनापासून स्वागत करतो. तुम्ही हिरवळ, हिमालयाची मनमोहक दृश्ये आणि नयनरम्य मठांच्या प्रेमात पडाल. हा भारतासाठी व्हिसा मुक्त देशांपैकी एक आहे, याचा अर्थ तुम्हाला फक्त भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे. भूतान हे जगातील सर्वात शांत ठिकाणांपैकी एक आहे, ते मनःशांती शोधणाऱ्या लोकांसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. येथे डोचू ला पास, गंगटे, पारो, थिंपू, तख्तसांग आणि लखंग सारख्या ठिकाणांना भेट देता येते.
* जमैका
जमैकाचा उल्लेख करताच समुद्रकिनाऱ्याचे दृश्य डोळ्यांसमोर तरळू लागते. हिरवीगार डोंगराळ जंगले, उंच कडा असलेले किनारे आणि प्रेक्षणीय नाइटलाइफसाठी हे एक आवडते ठिकाण आहे. भारतीय नागरिकांना येथे 30 दिवस राहण्यासाठी पर्यटक व्हिसा आवश्यक नाही. येथील समुद्राच्या लाटांमध्ये जीवनाचा आनंद लुटणे तुमच्यासाठी कायम संस्मरणीय असणार आहे.