पुणे – विठ्ठल रामजी शिंदे पूल अर्थात बालगंधर्व पुलावर मोठ्या प्रमाणावर बेशिस्त पार्किंग करण्यात येते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. यामुळे यात दिवसेंदिवस भर पडत आहे.
वाहनचालकांनी बेशिस्त पार्किंग केल्यास वाहतूक शाखेकडून तातडीने जॅमर लावण्यात येतो. “नो-पार्किंग’ अंतर्गत शहरामध्ये “कोट्यवधी’ रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. मात्र, या पुलावर लावण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनांबाबतीत वाहतूक शाखा का “काणाडोळा’ करत आहे, असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे. महापालिका आणि जंगली महाराज रस्ता आणि पेठांना जोडणाऱ्या या पुलावरून रोज हजारो वाहने जातात.
वाहनांची रहदारी पाहता येथे “पार्क’ करण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. या बेशिस्त पार्किंगचा परिणाम पेठांमधील रस्त्यांवर होत आहे. बेशिस्त पार्क केलेली चारचाकी वाहने “लेन मार्किंग’पर्यंत येत असल्याने जवळपास अर्धारस्ता “पार्किंग’मध्येच जातो. पर्यायाने उर्वरित अर्ध्या रस्त्याहून वाहनचालकांना जावे लागत आहे. कोणताही “साइन बोर्ड’ देखील या परिसरामध्ये नसल्याने या “अघोषित’ पार्किंगवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.