नवी दिल्ली – भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याच्या सुमार कामगिरीवर चर्चा खूप होत आहेत मात्र, त्याच्यासारखा दर्जेदार फलंदाज कोणत्याही संघासाठी धोकादायक ठरेल. कोहली आता आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी ताजा तवाना झाला आहे. त्याने वर्कलोड कमी करण्यासाठी काही मालिकांमधून ब्रेक घेतल्यामुळे आता या स्पर्धेत तो निश्चितच मोठी खेळी करेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व आयपीएल स्टार शेन वॉटसन याने व्यक्त केला आहे.
कोहलीसारखे फलंदाज इतका काळ अपयशी ठरत नाहीत परंतू हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट काळ होता असे म्हणायला हरकत नाही. तो या अपयशाच्या गर्तेतून लवकरच बाहेर पडेल, असेही वॉटसनने सांगितले आहे.
दरम्यान, आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेला येत्या शनिवारपासून प्रारंभ होत असून दुसऱ्याच दिवशी रविवारी भारताचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे.
आशिया करंडक स्पर्धेसाठीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्या पराभवाचा वचपा काढण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी आहे.