नवी दिल्ली – चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका सध्या भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु आहे. सामन्यात पहिले दोन दिवस पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने गाजविल्यानंतर आता दमदार फलंदाजीमुळे भारताचे वर्चस्व राहिले असल्याचं दिसून येत आहे. अश्यातच, भारतीय संघाचा स्टार फलंदाज म्हणजेच ‘विराट कोहली’ने कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच काळानंतर शतक ठोकत आपल्या चाहत्यांना चांगलंच खुश केलं आहे.
विराट कोहलीनं 241 चेंडूत शतक ठोकलं असून भारतीय संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने आपल्या कसोटीतील शतकांचा दुष्काळ संपवला असल्याचं यातून दिसून आलं आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 28 वे शतक झळकावले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक आहे.
यासह विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सचिनने भारतासाठी एकूण 100 शतके झळकावली होती. त्याचबरोबर विराटने आतापर्यंत 75 शतके ठोकली आहेत. यापैकी 28 शतके कसोटीत, 46 एकदिवसीय आणि एक टी-20 मध्ये आहे.