कानपूरमध्ये पोलिस चौकी पेटवली
पोलिस निदर्शकांत जागोजागी धुमश्चक्री
मृतांची संख्या पोहोचली 15 वर
लखनऊ, कानपूर : सुधारीत नागरी कायद्याच्या (का) विरोधात उत्तर प्रदेशात सुरू असलेला हिंसाचार शनिवारीही सुरूच राहिला. कानपूरमधील यतिमखाना पोलिस चौकी निदर्शकांनी पेटवून दिली. तेथे पोलिस आणि निदर्शकांत जोरदार धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली. लाठीमार करत जमावाचा पाठलाग केला. त्यामुळे जणू युध्दभूमीसारखे स्वरूप आले होते.
पोलिस चौकीची आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दल घटनास्थळी रवाना झाले आहेत.
शिघ्रकृती दलाच्या जवानांनी वज्र वाहने बाहेर काढून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश देण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ वाजपेयी आणि माजी आमदार कमलेश तिवारी यांना अटक करण्यात आली. त्यांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
बाबूपुर्वा, नई सडक, मूलगंज आदी भागात जमाव जमला आहे. तेथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थितीवर पोलिस लक्ष ठेऊन आहेत, असे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले. का कायद्याविरोधात सुरू ासणाऱ्या निदर्शनामुळे झालेल्या हिंसाचारत मृतांची संख्या 15 वर पोहोचली असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुमारर 600 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कोणताही गोळीबार केला नसून जे मरण पावले ते दंगलखोरांच्या आपसातील गोळीबारात मरण पावले आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, रामपूरमध्येही पोलिस आणि विरोधकांत जोरदार धुमशान उडाली. त्यात पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झाले. का कायद्याला होणारा विरोध पाहता तो राज्यात राबवणे भाजपाची सरकारे असणाऱ्या राज्यांनाही कठीण बनले आहे. त्यामुळे देशव्यापी राष्ट्रीय नागरिकत्व योजना राबवण्याची योजना मागे पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजधानीत 13 पोलिस अधिकाऱ्यांसह 45 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री उफाळलेल्या हिंसाचारानंतर शनिवारी मात्र दिल्लीत शांतता होती.