सातारा -जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गौडा यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. संजय भागवत यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची बदली झाली होती.
जिल्ह्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आणणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे विनय गौडा यांनी सांगितले. भागवत यांची दि. 24 सप्टेंबर रोजी बदली झाली. दोनच दिवसांत विनय गौडा पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी लवकर पदभार न स्वीकारल्यामुळे सुरू असणाऱ्या
सर्व चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. विनय गौडा 2015 च्या “आयएएस’च्या बॅचचे अधिकारी असून त्यांनी प्रशासकीय अधिकारी सेवेची सुरवात नंदुरबारला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शासकीय विश्रामगृहात विनय गौडा यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी स्वागत केले. त्यानंतर काही मिनिटांत गौडा कार्यालयात दाखल झाले.
मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे स्वीकारली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे व अविनाश फडतरे, मनोज ससे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर व प्रभावती कोळेकर, कार्यकारी अभियंता अभय पेशवे यांच्यासह अधिकारी
कर्मचारी उपस्थित होते. करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणणे हेच आपले व्हिजन आहे. लवकरच सर्व विभागांचा आढावा घेऊन पदाधिकारी व अधिकाऱ्यांत समन्वय साधून चांगले काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे गौडा यांनी सांगितले.
जलद कामाची दाखवली झलक
विनय गौडा यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजय भागवत यांच्याकडून पदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर सर्व खातेप्रमुखांशी चर्चा केली. लवकरच सर्व विभागांचा विस्तृत आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर पाऊण तासातच जिल्हाधिकारी कार्यालयात करोना उपाययोजना आढावा बैठकीसाठी ते रवाना झाले. गौडा शिस्तप्रिय अधिकारी असून त्यांनी आपल्या जलद कामाची झलक काही मिनिटांतच दाखवून दिली.