‘आयएमए’चे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचे भावनिक उद्गार
पुणे – राज्यात करोना विषाणुचा शिरकाव झाल्यापासून सर्व डॉक्टर्स राज्य सरकारच्या आदेशानुसार बाधितांना उपचार देण्यात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना कोविड योद्धा ही उपाधीही देण्यात आली. या लढाईमध्ये शहीद झालेल्या योद्धांना 50 लाखांचे विमा कवच देणारी योजना जाहीर केली. आज, प्रत्यक्ष या योजनेअंतर्गत डॉक्टरांच्या नातेवाईकांनी अर्ज केले तर आरोग्य विभागाकडून हे अर्ज नाकारण्यात आले. ही खेदजनक बाब आहे.
कोविड योद्धांचा सन्मान तर सोडा किमान अहवेलना तरी करू नका, असे उद्गार इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी काढले.
करोना विषाणूच्या साथीमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना केंद्र सरकारने “करोना कवच’ ही मरणोत्तर 50 लाख रुपयांचा विमा देणारी योजना जाहीर केली होती. महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला सरकारी सेवेअंतर्गत असलेल्या डॉक्टर्सनाच सहभागी केले होते. त्यानंतर बेड्स कमी पडू लागल्याने राज्यातील सर्व खासगी दवाखाने ताब्यात घेतले.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनची ऑगस्ट महिन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या बैठकीत 50 लाख रुपयांचा विमा खासगी डॉक्टरांसाठी लागू केला जाईल, असे मान्य केले होते. त्यानुसार डॉ. सुधाकर शिंदे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य आरोग्य विमा सोसायटी, यांच्या सहीचे एक परिपत्रक काढून या बाबत अनुकूलता दाखवली होती. परंतु, करोना विरुध्द लढाईत राज्यातील खासगी वैद्यकीय सेवा देणारे 57 डॉक्टर्स मृत्युमुखी पडले.
या सर्व डॉक्टरांच्या नातेवाईकांनी या योजनेअंतर्गत केलेले अर्ज आरोग्यविभागाकडून नाकारण्यात आले.
…अन्यथा डॉक्टर्स निर्णय घेतील
विमा कवच ही योजना केंद्र सरकारची असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलून हा प्रश्न सकारात्मक दृष्ट्या सोडवण्याचे आश्वासन दिले गेले होते. त्याला एक महिना झाला तरी अद्याप राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. उलट शहीद डॉक्टरांच्या अर्जांना नाकारण्याची प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयात आणि राज्यातील सर्व डॉक्टरांमध्ये सरकारच्या या अवहेलानास्पद वृत्तीबाबत असंतोष आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स आपला याबाबतचा निर्णय घेतील, असा इशारा “आयएमए’कडून देण्यात आला आहे.