नगर – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणी कामाचा आढावा घेत, कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत 1 एप्रिल 2015 ते 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कर्जमाफीसाठी पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर “अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. त्यानुषंगाने कर्जमाफी योजनेच्या कामाचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेतला.
कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या आणि शासनाच्या पोर्टलवर “अपलोड’ करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या तातडीने प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कर्जमाफीसाठी जिल्ह्यात पात्र ठरलेले शेतकरी, बॅंक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी “लिंक’ करण्यात आलेले शेतकरी आणि शासनाच्या पोर्टलवर “अपलोड’ करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या इत्यादी मुद्यांची माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या अपलोड करण्यात नगर जिल्हा आघाडीवर आहे. 3 लाखहून अधिकारी शेतकऱ्यांचे रेकॉर्ड अपलोड करण्यात आले आहे. शासनाच्या पोर्टलवर या याद्या अपलोड झाल्याने आता शासनस्तरावर त्यांची छाननी होणार आहे. जिल्ह्यात 2 लाख 16 हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहे.
शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये!
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, कर्जमाफीचा लाभ देताना शेतकऱ्यांना कोणताही त्रास होता कामा नये, यासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.