सातारा – शहराजवळील शाहूपुरी हे नव्याने विकसित झालेले गाव मोठे आहे. शहराजवळ असूनही नगरपालिकेत समाविष्ट होण्याला विरोध करीत परिसरातील राजकारण्यांनी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळवली. ग्रामपंचायत झाल्यापासून अपेक्षित विकासाची गती पेलता आली नाही.
दोन गटांचे राजकारण हेच त्याचे मुख्य कारण आहे. खरं तरं हा परिसर विकसित होण्यासाठी खूप वाव आहे. मात्र, प्राथमिक सुविधांच्या अभावीच तो त्रस्त आहे. त्यासंदर्भात दै. “प्रभात’ने वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. अजूनही तो सुरू राहणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा यांसह अनेक समस्यांनी शाहूपुरीला घेरले आहे. विकासाचे राजकारणविरहित “व्हिजन’ ठेवले तरच काही साध्य होणार आहे.
शहराजवळ असणाऱ्या गेंडामाळ भागात ही वसाहत विकसित झाली. जिल्हा परिषद कॉलनी, एलआयसी कॉलनी अशा पहिल्या स्थापन झालेल्या कॉलन्यांनंतर आता या परिसरात शेकडो कॉलन्या झाल्या आहेत. वसाहत विकसित होताना ना नगरपालिका ना ग्रामपंचायत अशा अवस्थेत कोणाचेच नियंत्रण नसल्यासारखा विकास झाला. अनियंत्रित विकासामुळे आधीच अनेक प्रश्न असताना ग्रामपंचायत झाल्यावर त्यात सुसुत्रता येण्याची गरज होती. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. लोकसंख्या वाढली.
त्या तुलनेत सुविधा निर्माण होऊ शकल्या नाहीत. हा परिसर म्हणजे मूळ एक गाव नाही. नोकरी किंवा कामधंद्यानिमित्त सातारा शहरात परगावातून आलेल्या लोकांनी शहराजवळ म्हणून जागा घेत बांधलेली घरे या भागात आहेत. त्यामुळे या गावाची एकत्रित जत्रा नाही. मूळ गाव दुसरीकडे असणाऱ्या ग्रामस्थांनी एकत्रित येण्याचा संबंध नाही. चेहरा नसलेले गाव म्हणून शाहूपुरी विकसित झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नोकरदार, छोट्या- मोठ्या व्यवसाय- व्यापारातून नव्याने उभी राहणारी पिढी इथल्या मातीत रूजत गेली.
वसाहत नव्याने झाली तरीही राजकारण मात्र रंगत राहिले. नगरपालिका हद्दीत येण्यास या भागातून मोठा विरोध राहिला. त्यामुळेच ग्रामपंचायतीची स्थापना झाली. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून दोन गटांचे टोकाचे राजकारण सुरू झाले. अर्थाच सातारा शहरातील राजकारणाची सावलीच शाहूपुरीत पडली. शहरातील दोन राजेंचे दोन गटच इथल्या राजकारणात कार्यरत आहेत. विकासाचे कोणतेही व्हिजन न ठेवता ग्रामपंचयतीची सत्ता आपल्या ताब्यात राहवी, यासाठी धडपडणारी दोन्ही गटांतील मंडळी एकमेकांत भिडत राहिली. त्यात विरोधकांच्या वार्डात कामच करायचे नाही, अशी भूमिका ठळक राहिली.
त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या संघर्षात गावाचा विकास खुंटला. अपेक्षित गती साध्य करता आली नाही. दोन्ही राजांचे समर्थक असल्याने सर्वसामान्य लोकांनी दाद तरी कुणाकडे मागायची असा प्रश्न असतो. दोन्ही राजेही निवडणुकीनंतर सत्ता आल्याचे श्रेय घेतात. नंतर लक्ष देत नाहीत. या साऱ्या राजकारणापायीच शाहूपुरीच्या विकासाची दिशा हरवली. खरं तरं योग्य नियोजबद्ध विकास करता आला असता. अजूनही वाव आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. कचऱ्यासाठी ट्रॅक्टरचे नियोजन असले तरी काही ठिकाणी ढीग दिसतात. पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मीटरद्वारे होत असतानाही वितरणाची ओरड कायम असते.
ग्रामपंचायतीचे त्यावर काहीही नियंत्रण नाही. नवीन पाणीयोजनेच्या कामाचा पाठपुरावा नाही. सर्व भागात सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गटाराची व्यवस्था नाही. परिसरातील विविध सोसायट्यांच्या मोकळ्या जागांच्या योग्य विकासाचे नियोजन नाही. रस्त्यावरभरणाऱ्या भाजीमंडईसाठी ग्रामपंचायतीची व्यवस्था नाही. जागा असूनही बागा विकसित करण्याचे धोरण नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह नाही.
एवढे मोठे गाव असले तरी आरोग्यासाठी कोणतीच सोय नसल्यामुळे खासगी डॉक्टरांकडे जाण्याशिवाय लोकांना पर्याय उरत नाही. इथली लोकसंख्या पाहता प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे, हे कोणत्याच लोकप्रतिनिधीच्या लक्षात येत नाही. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचा सदस्य असले तरी त्यांचेही लक्ष नाही. या शाहूपुरीची नकारघंटा संपतच नाही.
सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावात शाहूपुरीचा समावेश आहे. त्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत असले तरी किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यानींच पुढाकार घेऊन केवळ राजकारण न करता विकासाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. नेत्यांनीही आता कानउघाडणी करण्याची गरज आहे. नाही तर हे गाव समस्यांच्या गर्तेत अधिकच रुतत जाणार आहे. राजकारणामुळे विसकटलेली घडी सुरळीत करण्याची वेळ आताच साधली पाहिजे.