कातरखटाव – ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण वाढत चालल्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास दोन दिवस मुभा मिळाल्यामुळे लॉकडाऊनच्या धास्तीने बुधवारी कातरखटावसह अवघी खेडीपाडी रस्त्यावर आल्याने सोशल डिस्टनिंसगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
तालुक्यात आतापर्यत 7 जणांचा मृत्यू झाला असून 115 जण बाधित आहेत. आतापर्यंत बाहेरून आलेल्या 45 हजार लोकांची नोंद झाली आहे. कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विभागात कालअखेर बाहेरून आलेल्या लोंकाची संख्या 4291 झाली आहे. प्रशासनाने दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कातरखटावच्या प्रमुख बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती.
करोना रोखण्यासाठी प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केल्याने बाजारपेठेला जत्रेचं स्वरूप आलेलं दिसतं होतं. शुक्रवारपासून बाजारपेठ दहा दिवस बंद राहणार असली तरी अत्यावश्यक सेवा मेडिकल, दूध सेवा ठराविक काळात सुरू राहणार आहेत. कातरखटाव भागात काही ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. असे असताना नागरिक खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी नियमाचे उल्लंघन करू नये. व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.
अशोक पाटील, पोलीस निरीक्षक, वडूज.