वडूज – सामाजिक, राजकीय द्वेषापोटी गावोगावी मतभेदाच्या भिंती तयार झाल्या आहेत. याची लागण मोठ्या शहरापेक्षा खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. या मत व मनभेदाच्या भिंती तोडून गावामध्ये एकीचे वातावरण निर्माण करण्याबरोबर परिसरात निसर्गाचे चांगले संतुलन राखण्याचा संकल्प खटाव तालुक्यातील डाळमोडी येथील शेकडो युवकांनी केला आहे.
डाळमोडी गावामध्ये दोन वर्षापूर्वी किरण निकम, अजित माने आणि सचिन घाडगे या तरुणांनी वृक्षारोपणाचे बीज पेरले. या तीन तरुणांनी एकत्र येऊन राजकरण बाजूला ठेवून गावातल्या सर्व तरुणांना एकत्र केले व वृक्षारोपणाचे काम हाती घेतले. मागच्या वर्षी व या वर्षी मिळून 110 झाडांच्या संवर्धनाचे काम या तरुणांनी स्वखर्चातून सुरू केले आहे.
झाडांना पाणी देण्यासाठी गावातील आकाश पाटोळे व अमोल पाटील टॅंकर व ट्रॅक्टर विनामूल्य देत आहेत. नोकरीनिमित्त बारामती येथे असणारे डॉ. एच. एस. पाटील, हरिदास चौधरी, संतोष माने गावातील तरुणांना वृक्षसंवर्धनासाठी लागेल ती मदत करत आहेत. आतापर्यंत या टीमने 30 हजार रुपयांपर्यंत खर्च केला आहे. गावामधील वनीकरणात या टीमने मोठ्या होणाऱ्या वृक्षांच्या तीन हजार बियांची लागवड केली आहे.
निसर्गासाठी, मुक्या पशुपक्ष्यांसाठी चाललेला हा एक लढा आहे. या वृक्षरोपणाचा पहिला वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, माजी सरपंच विष्णूपंत निकम, राजेश निकम, बाबा शिंदे, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर उपस्थित होते.
पूर्ण वर्षभर झाडांची निगा राखण्यासाठी अजित चौधरी, अक्षय चौधरी, भूषण घाडगे, गजानन निकम, प्रमोद पाटोळे, आकाश चौधरी, नानासाहेब चौधरी, रूपेश माने, सुभाष चौधरी, विठ्ठल चौधरी, श्रीकांत निकम, विशाल चौधरी, अनिकेत चौधरी, योगेश माने, सुशांत चौधरी, पवन चौधरी, सुशांत खोडसे, ओंकार चौधरी, भरत चौधरी, महेश पाटोळे, काकासो पाटोळे, विशाल निकम, सौरभ घाडगे, सागर घाडगे, लक्ष्मण शिंदे, किरण निकम, सुमित निकम, आन्ना रायते, अर्जुन शिबे, सागर शिबे, शुभम चौधरी, तुषार माने, बबन देशमुख, गणेश चौधरी, निखिल निगडे, यशवंत जाधव, अक्षय शिबे यांचा वाटा मोठा आहे.