उत्तम पिंगळे
शाळेचे गुरुजी जवळपास दीड महिन्याने शाळेकडे जायला निघाले. हातात छत्री व तोंडावर मास्क लावून हळूहळू चिखलाच्या पायवाटेतून शाळेकडे निघाले. दीड महिन्यांपूर्वी सर्व मुलांचा रिझल्ट लावायला आले होते.
आता नवीन प्रवेशाचे बघायचे होते. छोट्या छोट्या मुलांना पहिलीमध्ये घ्यायचे होते. शाळेजवळ येताच बाजूला स्वतंत्र कार्यालयाची खोली होती ती त्यांनी उघडली. दोन वेगळी रजिस्टर व एक पुस्तक घेऊन त्यांनी ते कार्यालय पुन्हा बंद केले. मग पुन्हा आल्या वाटेने जाऊ लागले. उगाचच त्यांना वाटत होते की, शाळा आपल्याला बोलावत आहे. पुन्हा त्यांनी मागे वळून पाहिले पण कुणीही नव्हते.
पुन्हा झपझप चालू लागले. कारण पाऊस येण्याची लक्षणे वाटत होती. पुन्हा त्यांना वाटू लागले की कोणीतरी आपल्याला मागे बोलावत आहे. ते क्षणभर थांबले व जणू त्यांना आवाज आला की, “गुरुजी, थांबा जरा मी आपली शाळा बोलत आहे’.
गुरुजींनी सभोवर पाहिले. पुन्हा आवाज आल्याचा भास झाला की, “मी शाळा बोलत आहे. समोरच्या वडाच्या पारावर बसा’. गुरुजी वडाच्या पारावर बसले व समोर शाळेच्या इमारतीकडे पाहू लागले. तोच आवाज आला, “बरं झालं आपण बसलात. दोन मिनिटे तुमच्याशी बोलायचे आहे. गुरुजींनी उगाचच सभोवार पाहून मान डोलावली. मग शाळा बोलू लागली.
“विद्यार्थी नसल्यामुळे गेले चार महिने अगदी सुन्न झालेले आहे. नेहमीचा तो आरडाओरडा, गोंधळ तसेच विविध खेळांनी मैदानातला धुडगूस नाही’. गुरुजी म्हणाले, “खरे आहे, मी एकटा किती ठिकाणी पुरा पडणार? त्यावर शाळा म्हणाली, “तसे नाही हो, तुम्हाला काही दोष नाही पण या साथीच्या रोगामुळे सर्वच ठप्प झालेले आहे. मागील विद्यार्थी आपण सर्वच पास केले. आता नवीन विद्यार्थी कधी येणार त्याची मी वाट पाहात आहे’.
गुरुजी त्यावर म्हणाले, “माझीही तीच अवस्था आहे. बघू आता हा रोग कधी दूर होईल व आपली शाळा नियमित कधी सुरू होईल याची मीही वाट पाहात आहे. आता मी रजिस्टर घेऊन जात आहे. कारण गावातील पालकांना त्यांच्या मुलांची नावे नोंदवायची आहेत. घरबसल्या हळूहळू उरकून टाकेन. बाकी तुझे काय म्हणणं आहे?’
शाळा म्हणाली, “मी तर तुम्हाला आधीच सांगितले आहे की, खूप कंटाळा आला, पण वाईटातूनही एक चांगली गोष्ट होते ते बाकी घडले आहे. चाकरमानी जे गावात येत आहेत त्यांना चौदा दिवस क्वारंटाइन करण्यासाठी माझा उपयोग केला जात आहे. त्यामुळे एक फायदा झाला की इतके वर्षे तुम्ही जे सरपंचांच्या मागे पडला होता की शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व मुलांना स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. पण यानिमित्ताने या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत.
हं… आता लोकांनी थोडी अस्वच्छता केली आहे’. त्यावर गुरुजी म्हणाले, “एकदा शाळा सुरू होऊ दे, मग मी गावकऱ्यांनाच घेऊन स्वच्छ करून घेईन. तसेच चाकरमान्यांनी रंगरंगोटीसाठीही मदत जाहीर केली आहे. नंतर तुझे रूप पालटून जाईल’. शाळा हे ऐकून मनोमन खूश झाली. पुढे गुरुजी म्हणाले, “मी आता निघतो, कारण नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलांचे पालक उद्यापासून घरी येतील’.
शाळेच्या इमारतीला नमस्कार करून मास्तर माघारी फिरतात. शाळाही आपल्या वास्तूकडे पाहून आपली चांगली डागडुजी होणार या आनंदात हसते…