व्हॅनकुवर (कॅनडा) – भारत-चीन सीमेवरील तणाव निवळण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांमधील चर्चेची प्रक्रिया सुरू असतानाच कॅनडातील भारतीय समुदायाने चीनच्या दूतावासाबाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. निदर्शने करणाऱ्या नागरिकांनी हातांमध्ये “बॅक ऑफ चायना’ आणि “स्टॉप किलींग पीपल इन इंडिया’ यासारखे फलक हातात घेतले होते.
चीन नेहमीच शेजारी देशांना धमकावत असतो. तसेच शेजारी देशांच्या हद्दीत घुसखोरीही करत असतो. सद्यस्थितीत चीन हा सगळ्यात मोठा माफिया आहे, असे एका निदर्शकाने सांगितले.
चीनजवळ खूप मोठा भूभाग आहे. तरीही अक्साई चीनही बळकावला आहे. त्यांनी भारतीय सैनिकांना फसवणूक करून ठार मारले आहे. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे.
मात्र चीनकडून त्याबाबत काहीही वक्तव्य होत नाही आहे, असेही एका निदर्शकाने सांगितले. चीनच्या कृतीचा निषेध करून चिनी वस्तूंवर जगाने बहिष्कार घालावा, असे आवाहनही या निदर्शकांनी केले आहे.
चीनच्या विस्तारवादी भूमिकेचा आणि आक्रस्ताळेपणाचा निषेध आपण करत आहोत. हॉंगकॉंग, तैवान आणि तिबेटच्या नागरिकांनी चीनविरोधात आंदोलन केले आहे. त्यांना समर्थन द्यायला हवे, असे या निदर्शकांनी सांगितले.