सातारा -करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना आखल्या. ग्राम करोना दक्षता समितीने बाहेरुन येणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष करुन माहिती लपवल्याचा ठपका ठेवत सोनके (ता. कोरेगाव) येथील समितीला प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी नोटीस बजावली. नोटीस सोनके येथील समितीला बजावली असली तरी या नोटिसीने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गावोगावच्या ग्राम करोना दक्षता समित्या सतर्क झाल्या असून बाहेरुन येणाऱ्या नागरिकांवर वॉच ठेवण्यात येत आहेत.
बाहेरच्या जिल्ह्यातून गावोगावी येणारे लोंढे गावाच्या बाहेरच विलगीकरण कक्षात थोपवण्याची मोठी जबाबदारी या समित्यांवर येऊन ठेपली आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आदी मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यातही या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचा आकडा 80 असून त्यातील 60 बाधित एकट्या कराड तालुक्यातील आहेत.
बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत परिश्रम घेत आहेत. जिल्ह्याच्या तालुक्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. सर्वत्र पोलिस बंदोबस्त 24 तास तैनात आहे. याशिवाय महसूल व इतर विभागांचीही निगराणी पथके बनवण्यात आली आहेत.
जिल्ह्याच्या सीमा सील असल्या तरी विविध फंडे राबवत जिल्ह्यात विविध गैरमार्गांनी नागरिक येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्राम करोना दक्षता समितीची स्थापना केली. समितीत सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, बचत गटाच्या अध्यक्षा, ग्रामपंचायत सदस्य आदींचा समावेश आहे. या समितीने कोणी बाहेरुन गावात येऊ नये यासाठी उपाययोजना करायच्या आहेत. याशिवाय करोनाबाबत जनजागृती करुन नागरिकांना भयमुक्त करायचे आहे.
बाहेर गावावरुन कोणी आल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. बाहेर गावावरुन येणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित करुन प्रशासनास कळवण्याचे महत्वाचे काम या समितीवर सोपवण्यात आले आहे. समितीला अधिकार असतानाही अनेक ठिकाणी या समित्या कागदोपत्रीच आहेत. परिणामी कोणीही बाहेरुन यावे आणि गावात वास्तव्य करावे, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सोनके येथे कराड येथून काही नागरिक चालत आले. या नागरिकांनी त्यांच्या गावातील घरी जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ग्रामस्थांनी त्या कुटुंबांस गावात शिरण्यास अटकाव केला. त्यानंतर संबंधित कुटुंब काही दिवस गावाबाहेर वास्तव्यास होते. याबाबत प्रशासनास कोणतीही माहिती न दिल्याचा ठपका समितीवर ठेवण्यात आला आहे. सोनके गावाबाहेरच्या कुटुंबातील एक व्यक्ती करोनाबाधित झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार शुभदा शिंदे यांच्यासह तालुका प्रशासन गावात दाखल झाले. प्रशासनाने याठिकाणी आवश्यक उपाययोजना करुन संपूर्ण गाव सील केले तर काही नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले.
या प्रकरणाची प्रांताधिकारी नलावडे यांनी माहिती घेतली. त्यानुसार नलावडे यांनी ग्राम करोना दक्षता समितीस नोटीस बजावली. हलगर्जीपणा केल्याचा ठपका या समितीवर ठेवण्यात आला असून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. प्रांताधिकाऱ्यांच्या या निर्णयाचा परिणाम मात्र संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे.
चक्क ग्राम करोना दक्षता समितीला नोटीस बजावण्यात आल्याने आता गावोगावी सतर्कता बाळगण्यात येत आहे. बाहेरच्या गावाहून येणाऱ्यांवर वॉच ठेवण्यात येत असून लपून छपून बाहेरुन आलेल्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करुन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. एका समितीला नोटीस बजावली असली तर संपूर्ण जिल्हाच या कारवाईने हलला असून आता तरी गावोगावी या समित्यांनी प्रामाणिकपणे काम करुन करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खुलाशानंतर कारवाई होणार का?
प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी सोनके ग्राम करोना दक्षता समितीवर हलगर्जीपणाचा आरोप ठेवला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपल्यावर गुन्हा का दाखल करुन नये, अशी नोटीस समिती सदस्यांनी बजावण्यात आली. त्यामुळे याबाबतचा खुलासा समितीचे सदस्य काय देणार, तो प्रशासनास योग्य नाही वाटला तर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.