शिरवळ – भादे येथे चोरीच्या उद्देशाने युवकाला दगडाने ठेचून ठार करणाऱ्या आणि विविध जिल्ह्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार करण संजय ठोंबरे (वय 19, रा. खेड, ता. खंडाळा) याच्यासह सात जणांना शिरवळ व खंडाळा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. या टोळीकडून खुनाच्या गुन्ह्यासह अहिरे येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न, प्रेमी युगुलाची लूटमार व विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले चोरीचे तब्बल 21 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.
या टोळीकडून 14 मोटारसायकली, दोन ट्रॅक्टरसह 12 लाख 55 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील दोन अल्पवयीन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भादे गावच्या हद्दीत वीर धरण परिसरामध्ये 26 जानेवारी रोजी 35 ते 40 वर्षे वयाच्या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती.
या प्रकरणी फलटणचे पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक सागर अरगडे, हवालदार हजारे, रवींद्र कदम, वैभव सूर्यवंशी, आप्पासाहेब कोलवडकर, अमोल जगदाळे, स्वप्निल दौंड, श्रीनाथ कदम, सचिन वीर यांच्या पथकाने या टोळीवर पाळत ठेवली होती. पोलिसांनी वेशभूषा बदलत खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित करण ठोंबरे, राम कमलाकर संत्रे (वय 22, मुरुम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) व अंकुश कोंडिबा सूर्यवंशी (वय 34, बालेघर, ता. वाई) यांना पकडण्यात यश मिळवले. त्यानंतर या टोळीने केलेले विविध गुन्हे उघडकीस आणण्यात शिरवळ पोलिसांना यश आले.
चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दोन अल्पवयीन युवकांसह हिमालय सतीशकुमार धायगुडे (वय 19, खेड, ता. खंडाळा),अक्षय तात्याबा धुलगुडे (वय 21, आरडगाव, ता. खंडाळा), सागर दत्तात्रय शेळके (वय 22, निंबोडी, ता. खंडाळा), साहिल सतीश वेळे (वय 19, रा. सुखेड, ता.खंडाळा) यांना शिरवळ पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून 12 लाख 55 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील सात संशयितांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना खंडाळा येथे न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.