पुणे – शहरात पावसाळ्याच्या महिनाभर आधीच अतिधोकादायक वाडे (पावसाळ्यात कोसळू शकणारे) उतरवण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. पण, निम्म्याहून अधिक धोकादायक वाडे मालकांच्या हट्टापायी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी वाडामालक “राहण्यासाठी घर नाही’, “भाडेकरू आहेत’, “साहित्य ठेवायला जागा नाही’ “आम्हीच स्वत:च वाडा उतरवून घेतो’, अशी कारणे देत वाडे उतरवण्यास टाळाटाळ करत आहेत.
महापालिकेने शहरात केलेल्या सर्वेक्षणात यावर्षी 65 धोकादायक वाडे आढळले आहेत. त्यातील 31 वाडे उतरविण्यात आले असून, चार वाड्यांचे न्यायालयीन दावे सुरू आहेत. तर एका वाड्यात झाड असल्याने हे पाच वाडे उतरविता येणार नसल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यात वाडा कोसळून जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार
कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक वाडे 100 वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. महापालिकेकडून दरवर्षी अशा वाड्यांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर अतिधोकादायक, धोकादायक मात्र दुरुस्तीनंतर वापरता येणारे तसेच कमी धोकादायक (किरकोळ दुरुस्ती आवश्यक असलेले) असे गट केले जातात. त्यानंतर, धोकादायक वाडा उतरवून घेण्याची नोटीस वाडामालकांना दिली जाते. तर, वाडामालकांना तो उतरविणे शक्य नसल्यास महापालिका स्वत: तो उतरवून त्याचा खर्च वाडा मालकांकडून वसूल करते. यावर्षी आतापर्यंत सुरू असलेल्या सर्वेक्षणात 65 धोकादायकवाडे आढळून आले असून, त्यातील 31 उतरविण्यात आले आहेत.
अति धोकादायक वाड्यांमधील 31 वाडे आतापर्यंत उतरविण्यात आले आहेत. अनेक मालकांनी स्वत: वाडे उतरविण्याचे महापालिकेस कळविले आहे. मात्र, त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याचे लक्षात येत असल्याने खरबदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवसांत वाडे उतरवण्याची नोटीस त्यांना देण्यात येणार आहे. त्यांनी कार्यवाही न केल्यास महापालिकाच कारवाई सुरू करणार आहे, असे मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे म्हणाले.
आता पालिकाच करणार कारवाई
वाडे मालकांना महापालिकेकडून वारंवार नोटीस देण्यात येतात. त्यानंतरही प्रत्येक वेळी आठ दिवसांची मुदत मागत महापालिकेची कारवाई टाळली जात आहे. मात्र, सध्या संततधार पाऊस सुरू आहे. तसेच पावसाळा आणखी तीन महिने असल्याने आठ दिवसांच्या आत वाडा मालकांनी ते उतरविण्यास सुरूवात न केल्यास ही कारवाई केली जाणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.