नगर – भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील वाहन प्रवेश कर बंद करण्यात आला आहे. अहमदनगर, औरंगाबाद व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत हा वाहन प्रवेश कर केंद्र सरकारने रद्द केला. त्याबाबतचे गॅझेट केंद्र सरकारने काढले असून त्याची अंमलबजावणी बुधवारी (दि.12) रात्रीपासून करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी दिली.
देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत यापुर्वी व्हीएएफ हा केंद्र सरकारने बंद केला. परंतु व्हिएटी (वाहन प्रवेश कर) हा लोकल कायदा असल्याने तो चालू होता. या कायद्यामुळे स्थानिक नागरिकांसह रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अथवा अडचणी येत होत्या. त्याबाबत केंद्र सरकारच्या संबंधित विभागाला तक्रारी झाल्या. तक्रारी असल्याने व्हिएटी (वाहन प्रवेश कर) हा लोकल कायदा केंद्र सरकारला बंद करायचा होता.
त्यानुसार व्हिएटी (वाहन प्रवेश कर) हा लोकल कायदा रद्द करुन 11 एप्रिलच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास केंद्र सरकारने गॅझेट प्रसिद्ध केले. केंद्र सरकारने ही सर्व प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित कॅन्टोन्मेंट बोर्डला अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यानुसार भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मानद सदस्य वसंत राठोड यांनी हा व्हिएटी (वाहन प्रवेश कर) हा लोकल कायदा ताबडतोब रद्द अथवा बंद झाला पाहिजे, असा अभिप्राय केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता.