पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शेतकर्यांना पीक कर्ज मिळणे अधिक सोपे व्हावे, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अॅग्री स्टॅक या अॅपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार आहे. ते विनातारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे.
महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प येत्या मेपासून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली.
शेतीसाठी कर्ज काढण्यासाठी बँकांचा जाच मोठा असतो. कर्ज मंजूर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यातही तारण काय द्यायचे हा मोठा प्रश्न असतो. पीक कर्ज काढतानाही अनेक बँका आर्थिक विवरण पत्रे भरून घेतात.शेतकऱ्यांची ही समस्या ओळखून केंद्र सरकारने एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे.
राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून ई पीक पाहणी अर्थात पिकांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अॅप विकसित करण्यात आले आहे. ई-पीक पाहणी व जमीन नोंदीच्या माहितीचा आधार घेऊन या बीड व फारुखाबाद या दोन्ही जिल्ह्यातील सातबारा उतारे आधार क्रमांकाची संलग्न करण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६५ टक्के सात-बारा उतारे आधारला जोडण्यात आले आहेत.
पीक कर्ज काढताना सात-बारा उतारा, पिकांची नोंद व आधार क्रमांक या बाबी आवश्यक असतात. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या बाबींची पूर्तता झाल्याने अॅग्री स्टॅक या अॅपवर येथील शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्याआधारे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच हे ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कर्ज मिळण्यासाठी अशी आहे प्रक्रिया
मोबाइलमध्ये अॅप डाऊनलोड केल्यानंतर नाव आणि आधार क्रमांक टाकल्यावर एसएमएसद्वारे आलेल्या ओटीपीतून त्याची पडताळणी केली जाईल. तसेच फेस आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्याची खात्री पटविण्यात येईल.
त्यानंतर शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास, तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकांच्या कर्जाची ऑफर शेतकऱ्याला दिसू शकेल. त्यातील एक ऑफर स्वीकारून केवळ दहा मिनिटांतप्रक्रिया करून कर्ज शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होईल. या प्रक्रियेत राष्ट्रीय, खासगी तसेच सहकारी बँकांचा देखील समावेश आहे.