पुणे -“एल निनो’मुळे यंदा देशातील मान्सून सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शासनाकडून आतापासूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन 31 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश जलसंपदा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यानुसार, महापालिकेकडूनही पाणीबचतीसाठी उपाययोजना केल्या जाणार असून, ऑगस्टअखेर पर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याची चाचपणी पालिकेकडून करण्यात येत आहे.
या बंदमुळे ऑगस्टपर्यंत किती पाणी वाचेल हे निश्चित करून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी स्पष्ट केले. याशिवाय सध्याची पाणीपुरवठ्याची वेळ कमी करून दररोज पाणी दिल्यास किती पाणीबचत होईल, याचाही अहवाल प्रशासन तयार करणार आहे.
पालिकेची कसरत
या वर्षीप्रमाणेच 2015 मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात खालावला होता. त्यावेळी शासनाकडून महापालिकेस ऑक़्टोबर ते मे या सात महिन्यांसाठी धरणात उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यातील अवघे साडेनऊ टीएमसी पाणी मंजूर केले होते. पुणेकरांनी केलेली पाण्याची बचत, महापालिकेने केलेले पाण्याचे वाटप आणि नियोजन याच्या जोरावर या दहा महिन्यांत अवघे साडेआठ ते नऊ टीएमसी पाणी वापरले होते. त्यानंतर जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ही कपात मागे घेण्यात आली होती. मात्र, त्यावेळी महापालिकेत नवीन 34 गावांचा समावेश झाला नव्हता. मात्र, या गावांना महापालिकाच रॉ वॉटर देत होती.
आता पालिकेत 34 गावे आली असून, त्यांना मोठ्या प्रमाणात वर्षभर टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. तर शहराची पाण्याची मागणीही गेल्या सात वर्षांत सुमारे 30 ते 35 टक्के वाढली आहे. अशा स्थितीत महापालिकेस पाणी नियोजनासाठी कसरत करावी लागणार आहे.