पुणे -मार्केट यार्डात मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी अधिक असल्याने कांदा, फ्लॉवर, वांगी, तोंडली आणि गाजराच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, आवक वाढल्यामुळे आले, टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची, कोबी आणि मटारच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी येथील बाजारात 140 ते 150 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून कोबी 10 ते 12 ट्रक, इंदौर येथून 6 ते 7 टेम्पो गाजर, बंगळुरू येथून 2 टेम्पो आले, कर्नाटक येथून 2 ट्रक घेवडा, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची साडेपाच ते सहा हजार गोणी इतकी आवक झाली.