सयाजी शिंदेंच्या आरोपांना सुधीर मुनगंटीवारांचे उत्तर
मुंबई : राज्य सरकारने राज्यात 33 कोटी वृक्षलागवड करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच सरकारचा हा कोणता उपक्रम नसून ती स्वंयप्रेरणेने सुरू झालेली एक चळवळ आहे, असे राज्याचे वनमंत्री म्हटले आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारची वृक्षलागवड ही केवळ दिखाव्यापुरतीच असल्याचा आरोप केला होता. त्यालाच आज सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे.
सयाजी शिंदेंचा आरोप म्हणजे अज्ञान आणि माहितीचा अभाव असून 33 कोटी वृक्षलागवड ही सरकारी योजना नाही, तर आंदोलन असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. वृक्षलागवड हे केवळ वनविभागाचे कार्य नसून स्थानिक गाव व जिल्हापातळीवरील अनेक संस्था संघटनांचा यामध्ये सहभाग आहे. त्यासाठी, समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. तसेच, सरकारच्या नर्सरीमध्ये 156 प्रकारच्या प्रजातींचे वृक्ष आहेत. राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींना ही यादी आणि वृक्षांची रोपे पुरविण्यात आलेली आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा आदर्श घेऊनच देशात 125 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. तर, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही आपल्या उपक्रमाची नोंद घेतल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितले.