आम आदमी पक्षाने अवघे 33 वर्षे वय असलेले राघव चढ्ढा यांना राज्यसभेवर पाठविले आहे त्याबाबत…
आम आदमी पक्ष हा स्थानिक नसून उपरा आहे, या प्रचारास चोख उत्तर देत या पक्षाने पंजाबात सत्ता मिळवली आहे. शिक्षण, आरोग्य आणि ऊर्जाक्षेत्रात ठोस उपक्रम राबवण्याचे आश्वासनही आपने दिले आहे. पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आमदारांच्या पेन्शनचा फॉर्म्युला बदलण्याची घोषणा करत धमाकाच उडवून दिला आहे. एखादी व्यक्ती कितीही वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आली, तरी पेन्शन मात्र एका टर्मचेच मिळणार आहे.
आम आदमी पक्षाने पंजाबचे मैदान मारल्यानंतर आणखी एक मोठा जय मिळवला आहे. राज्यसभेवर आपचे पाच खासदार बिनविरोध निवडून आले असून, त्यामध्ये दोघेजण प्रसिद्ध व्यक्ती आहेत, तर तिघेजण आपापल्या क्षेत्रात नामवंत आहेत. त्यापैकी एक आयआयटीचे प्राध्यापक संदीप पाठक असून, ते आपमध्ये गेली तीन वर्षे सक्रिय आहेत. पक्षसंघटना मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोककुमार मित्तल आणि कृष्णा प्रण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल ट्रॅस्टचे संस्थापक संजीव अरोरा यांनाही आपने राज्यसभेवर पाठवले आहे. शिवाय जगप्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजनसिंग याचीही लॉटरी लागली.
या पाचमधील आणखी एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे पंजाबमधील आपचे सहप्रभारी आणि पक्षाचे एक तरुण, तडफदार नेते राघव चढ्ढा हे होत. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 पैकी 92 जागा आपने जिंकल्या असून, या यशात नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री मान यांच्याबरोबर राघव यांचा महत्त्वाचा वाटा आहे. राघव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर तुफानी टीका केली होती. चन्नींच्या मतदारसंघातच सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाच्या मुद्द्यावर त्यांनी रान उठवले होते. राघव यांचे वय अवघे 33 असून, वरिष्ठांच्या सभागृहाच्या इतिहासातील ते सर्वात तरुण खासदार आहेत.
चढ्ढा व पाठक हे आपच्या रणनीतिकार टीममधले मुख्य खेळाडू आहेत. राघव हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असून, ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे पदवीधर आहेत. यापूर्वी दिललीतील राजेंद्रनगर मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. पुढे ते आपचे राष्ट्रीय प्रवक्ते बनले. केजरीवाल यांनी त्यांच्यावर पंजाबची जबाबदारी सोपवल्यानंतर, राघव यांनी बूथ पातळीपासून तेथे आपची संघटना बांधली. निवडणुका जाहीर झाल्याच्या काही दिवस अगोदर कॉंग्रेस पक्ष जागा होतो, तसे आपचे नाही. अर्थात 2019च्या लोकसभा निवडणुकीत राघव यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. राजेंद्रनगर का बेटा असे म्हणत, त्यांनी प्रचार केला होता. राघव हे आपचे स्टार प्रचारकही होते.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना राघव सोशल मीडियावरही सक्रिय होते. त्यावेळी त्यांना लग्नासाठी अनेक प्रस्ताव आले. परंतु सध्या देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत नसल्याने, ही वेळ लग्नासाठी योग्य नाही असे कारण देत त्यांनी लग्नाचे प्रस्ताव फेटाळून लावले होते. राघव हे बालपणापासूनच अत्यंत हुशार विद्यार्थी होते. शाळेच्या नाटकात त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे केली होती. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत त्यांना सतत पारितोषिके मिळत असत. गेली दहा वर्षे वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमधून आपची बाजू ते अतिशय प्रभावीपणे मांडताना बघावयास मिळाले. फेब्रुवारी 2020 पासून राघव हे दिल्लीचे आमदार होते.
राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लंडनमधून पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केल्यानंतर राघव यांची केजरीवाल यांच्याशी भेट झाली. तेव्हा “इंडिया अगेन्स्ट करप्शन’ तर्फे अण्णा हजारेंचे आंदोलन शेवटच्या टप्प्यात आले होते. त्यानंतर आपची स्थापना झाली व तेव्हापासूनच राघव पक्षाबरोबर जोडले गेले. आपचा जाहीरनामा तयार करणे, जनसंपर्क विभागाचे कामकाज बघणे आणि रणनीती ठरवणे, या जबाबदाऱ्या राघव यांनी समर्थपणे सांभाळल्या. दिल्लीत जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या अभ्यासगटात तेही होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे सल्लागार म्हणूनही राघव यांनी काम पाहिले.
केजरीवाल जेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री बनले, त्यानंतर काही वर्षांतच त्यांनी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तेव्हा जेटली यांनी केजरीवालांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला. तेव्हा केजरीवाल यांना कायदेशीर सल्ला देण्याचे काम राघव यांनी केले. राघव यांनी दिल्ली जल बोर्डाचे अध्यक्षपद, तसेच दिल्ली विधानसभेच्या लेजिस्लेटिव्ह कमिटीचे अध्यक्षपदही भूषवले. राघव यांनी पंजाबमधील पक्षाची मोठी जबाबदारी स्वीकारली होती, त्यावेळी पक्षात गटबाजी शिरली होती. त्यावर मात करून, पक्षात एकोपा आणण्यात त्यांना यश मिळाले. राघव हे कामात पूर्ण लक्ष देतात. तसेच पक्षाचा विस्तार कशा प्रकारे होईल, यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवून त्या ते अमलातही आणतात. पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचे व्हिजन काय आहे, हे लक्षात घेऊन त्यानुसार काम करण्याचे कौशल्यही राघव यांच्याकडे आहे.
2013 साली केजरीवाल, सिसोदिया आणि संजय सिंग हे पक्षाचे बडे नेते जेव्हा निवडणुकीत व्यग्र होते, तेव्हा आपचा किल्ला वृत्तवाहिन्यांमधून लढवण्याचे काम राघव यांनी समर्थपणे केले. वित्तनियोजन, कर, लेखा परीक्षण, कायदा अशा विषयांत राघव यांना गती असून, त्यामुळे सार्वजनिक धोरण आणि प्रशासनात मूलगामी धोरण घडवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे.
दिल्लीला झालेल्या दंगलीतील फेसबुकची भूमिका काय होती, याचा शोध घेण्याची जबाबदारी ज्या विधानसभा समितीकडे होती, त्यात राघवही होते. त्यावेळी फेसबुकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे कामही त्यांनी उत्तमप्रकारे केले. मात्र, पंजाबमध्ये तिकीटवाटप करताना त्यांनी पैसे घेतले, असे आरोपही झाले होते. अर्थात ज्यांना तिकिटे मिळत नाहीत, ते असे आरोप करतच असतात. मात्र केजरीवाल राघव यांना झुकतेमाप देतात, अशीही टीका होते. ते काहीही असले, तरी अनेक पक्षांत अजूनही म्हातारबुवांची चलती असताना, आपने राघव चढ्ढा यांच्यासारख्या गुणवंत युवा नेतृत्वास प्रोत्साहन दिले, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
हेमंत देसाई