संयुक्त कुटुंब व्यवस्थेचे मूळ कशात आहे याचा विस्तृत धांडोळा घेण्यासाठी एक पत्रकार एका मोठ्या परिवाराच्या भेटीस पोहोचला. वाड्याबाहेर पटांगणात सात वर्षांचा एक मुलगा खेळत होता. पत्रकाराने त्याला काही विचारताच त्याने आपल्या वडिलांकडे बोट दाखविले. त्याचे वडील अर्थात अठ्ठावीस वय असलेला एक तरुण. पत्रकाराने त्याला त्यांच्या एकत्र कुटुंब व्यवस्थेचे गुपित विचारले. यावर त्याने स्वतःच्या वडिलांकडे बोट दाखवत सांगितले त्यांना विचारा. त्याचे पन्नाशीतील वडील घडीस चावी भरत होते. त्या पत्रकाराने त्यांना तोच प्रश्न विचारला. यावर स्मित हास्य करीत त्यांनीही वरच्या मजल्यावर असलेल्या गृहस्थाकडे अर्थात त्यांच्या वडिलांकडे जाण्याचा इशारा केला. पत्रकार वरच्या मजल्यावर पोहोचला.
तिथं त्यांचे सत्तरीच्या वयातील वडील निवांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. पत्रकाराने त्यांना एकत्र कुटुंबाच्या गुपिताबद्दल विचारले. वर्तमानपत्र बाजूला ठेवत त्यांनी त्या पत्रकारास आत स्वतःच्या वडिलांना विचारायला सांगितले. पत्रकार किंचितसा वैतागला पण कुतुहलाने आत गेला. तिथं त्यांचे वडील छानपैकी झोपाळ्यावर पहुडलेले होते. “बोला काय तुमचा प्रश्न?’ नव्वदीच्या घरात असूनही त्यांच्या आवाजात धार होती. पत्रकार महाशय बोलले, “मला एकत्र कुटुंब व्यवस्था टिकविण्याचे गमक काय आहे, ते जाणून घ्यायचं होतं?’ “अरे माझ्यापर्यंत येता येता तुझ्या हे लक्षात नाही आलं का?’ असे त्यांनी उलटपक्षी विचारले. पत्रकाराने नकारार्थी मान डोलावली. “जिथं प्रत्येक गोष्टीसाठी घराच्या मोठ्यांना विचारले जाते, ती कुटुंबं एकत्र म्हणून टिकतात. एकत्र कुटुंब व्यवस्थेचे हेच गमक आहे.’ तेव्हा त्या पत्रकाराच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
भारतीय सभ्यता आणि संस्कारांची ओळख असलेली एकत्र कुटुंब व्यवस्था खरे तर भारतीय समाजव्यवस्थेचे बलस्थान होय; पण चकचकीत जीवन पद्धतीच्या आहारी जाऊन आपण जे काही गमावून बसलो आहोत त्यात प्रामुख्याने ह्या व्यवस्थेचे नाव घ्यावे लागेल. स्वयंवादाची नखे लावत आपण यापासून फारकत घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की आज ही व्यवस्था पार कोलमडून गेली. या व्यवस्थेचं कैवार घेणारेही आता कोणी नजरेस पडत नाही.
“वसुधैव कुटुंबकम्’चे सूत्र जगाला सांगणारे आपण वैयक्तिक स्वार्थ आणि लालसे मागे धावत इतके प्रवाहपतित झालो की चुलत नात्याची तर लांब, सख्खेही आता नकोसे झाले आहेत. वाढती महत्त्वाकांक्षा, खुळखुळणारा पैसा, तडजोडीची वानवा, आक्रसलेले संयम या अप्रिय स्थितीमागील ही महत्त्वाची कारणं ठरावित. एखादे अवयव निकामी झाले तर शरीराच्या कार्यक्षमतेवर जशा मर्यादा येतात. तसेच कुटुंबसंस्थेचेही आहे. वेगळे होण्याच्या पर्यायाने मोकळीक मिळाली; पण नात्यात अंतर पडलं. असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. निर्धास्तपणा लयास गेला. भौतिक सुख मिळालं; पण निरागसपणा संपुष्टात आला.
प्रत्येक प्रसंगात आपल्या साथीस उभी राहणारी, आपल्या जल्लोषात आनंद घेणारी, दुःखाच्या वेळी मायेची पखरण करणारी, आपली कड घेणारी, धीर देणारी, आपल्या सुखा दुःखात सामील होणाऱ्या मंडळींना आपण पारखे झालो. खरंच ही लोकं भोवताली होती तेव्हा जगणे रसरशीत होते. एक उमेद होती. थोड्या फार कुरबुरी असल्यातरी एकत्र कुटुंबात आढळणारा जिव्हाळा, प्रेम, ओढ याचा पर्याय शोधूनही सापडणार नाही. अशी घरं भौतिकदृष्ट्या श्रीमंत नसतीलही पण तिथे समृद्धी कायमच नांदत असते.
नव्या व्यवस्थेत ज्येष्ठांपासून वेगळे होण्याबरोबरच आपण संस्कृती, सभ्यता आणि मर्यादा यास पारखे झालो आहोत. त्याचे दुष्परिणामही हळूहळू दिसू लागले आहेत. वेगळे राहण्याचा आग्रह आता एकटे पाडू लागलायं. आपल्या वाडवडिलांइतके शक्य नसेलही, पण आहे त्या नात्यांचा जाणीवपूर्वक सांभाळ करणे समाज स्वास्थ्यासाठी हितकारक ठरेल. तर्क आणि व्यवहारापेक्षा भावनांना अधिक महत्त्व द्या. प्रसंगी दोन पावले मागे या; पण कुटुंबपद्धतीला जपा. हा वारसा आहे. जे विस्कटलं ते जाऊ द्या. जे वाचवता येईल ते वाचवा.
असली-नकली
सत्येंद्र राठी