मराठी साहित्यात मैलाचा दगड मानली गेलेली ख्यातनाम लेखक-नाटककार-सिनेदिग्दर्शक विश्राम बेडेकर यांची “रणांगण’ कादंबरी 1939 साली लिहिली गेली. त्यानंतर गेल्या साठ वर्षांत या कादंबरीची अनेकवार पुनर्मुद्रणे झाली. शीर्षकापासून शेवटच्या पृष्ठापर्यंत वाचकाच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या कादंबरीची नायिका आहे, निर्वासित झालेली ज्यू असणारी हॅर्टा! हॅर्टाचे दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण परिस्थितीमुळे पणाला लागलेले आयुष्य, तिची ससेहोलपट, जगण्यासाठी विस्थापित होणे, प्रियकरासोबतची ताटातूट, अकाली आलेले दारिद्य्र, आजारी मनोरूग्ण आई अशा अनेक हृदयद्रावक गोष्टी कादंबरीच्या ओघात हळूवारपणे समोर येतात आणि मनाला एकेक ओरखडा ओढत पुढे जातात.
कादंबरी दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडाचा आधार घेत पुढे सरकते. प्रारंभच वाचकांसाठी धक्कादायक ठरतो. कादंबरी सांगणारा लेखक अर्थात नायक चक्रधर विध्वंस, अत्यंत विमनस्क अवस्थेत आहे. कारण कादंबरीच्या नायिकेने हॅर्टाने आत्महत्या केल्याची बातमी त्याला समजली आहे. चक्रधर मुंबईत आहे आणि आजच्या टाइममध्ये त्याने हॅर्टाच्या आत्महत्येची बातमी वाचली आहे. त्याच्या डोळ्यासमोर मागच्या अकरा-बारा दिवसांचा कालखंड उभा राहिला आहे.
ऑगस्टच्या महिन्यातला कुठलातरी दिवस. फ्रान्सच्या भूमीवरचे निसर्गसौंदर्य अगदी भरात आहे. त्याचवेळी चक्रधर रोम एक्सप्रेसने पॅरिसहून निघाला आहे. दुसऱ्या वर्गाच्या डब्यात तो बसला आहे. दुसऱ्या महायुद्धाचा कालखंड आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. चक्रधर मायदेशी म्हणजे भारतात निघाला आहे. आदल्या दिवशी त्याची एक नायकिणीशी गाठ पडते. ती नायकीण का बनली याची हकीगत चक्रधरला तिच्याकडून ऐकायची आहे. पोक्त वयाची, रंगरंगोटी केलेली ती स्त्री मूळची इंग्लिश, पण फ्रान्सच्या भूमीवर नायकीण झाली. ती हॉटेल वाढपिणीचं काम करे, तिचा प्रियकर लढाईवर गेलेला होता. दिवस संघर्षाचे होते. सैनिकांना पुरविण्यासाठी स्त्रिया हव्यात म्हणून शेकडो तरुण मुली फ्रान्समध्ये आणल्या गेल्या, त्यात ही देखील होती. तिची कहाणी त्याच्या काळजाला घरे पाडणारी आहे. या रेल्वेच्या प्रवासात त्याला ती आठवते.
सकाळी गाडी मादान फ्रॉंटीअर या फ्रान्सच्या सरहद्दीवर येते. त्यानंतर इटली, तेथून जिनेव्हा. त्याच्याजवळ इंग्लंडचा पासपोर्ट असतो. इटलीमध्ये सर्वदूर मुसोलिनीचे संदेश उभारलेले असतात. दुपारी तो बोटीवर पोहोचतो. थकल्यामुळे केबिनमध्ये पोहोचल्यावर बिछान्यावर तो अंग टाकतो आणि त्याला झोप लागते. जाग येते तेव्हा बोटीने किनारा केव्हाच सोडलेला असतो. सकाळी जाग येते तेव्हा चहाची घंटा झालेली असते. बोटीवरच्या काही हिंदी प्रवाशांशी चक्रधरची ओळख होते. त्यात डॉ. शिंदे आणि मन्नान नावाचा मुस्लीम युवक असतात. आता अकरा दिवस ही बोट हेच चक्रधरचे घर होते. चक्रधरला मुंबईला जावयाचे असते. बोटीवर भरपूर गर्दी असते. वेगवेगळ्या देशातले विविध मुसाफीर, स्त्री-पुरुष. बोटीवर सुखसोयींची चंगळ असते. खाणे, पिणे, राहणे, नाचणे. त्यात शौकिन पुरुषांचे बायकांकडे विशेष लक्ष असते. अल्पावधीत चक्रधरचे शिंदेशी मैत्र जुळते. जो तो आपापल्या मस्तीत असतो. बोटीवर “लुई’ नावाचे एक गोंडस बालक असते. शिंदेंना लुई फार आवडतो. संध्याकाळपर्यंत शिंदे-लुई आणि चक्रधर तिघांची चांगली मैत्री जुळते.
जिनेव्हाच्या आखातात बोट संथ चाललेली असते. बारमध्ये चौघेजण ब्रिज खेळत असतात आणि काहीजण तो डाव बघत असतात. त्यात एक तरुणीही असते. लेखक तिचे वर्णन करताना म्हणतो, “तिचे लोकरीसारखे केस, ते एका फितीने बांधलेले. वर्ण गोरा. उंच कपाळ. फार मोठे नव्हते पण पाणीदार असे निळे डोळे. नाक खूप धरधरीत होते. तिच्या ओठांची एक गंमत असे. मिटले म्हणजे फक्त एक बारीक रेषा दिसे. विलग झाले की त्यांचा रेखीव बाक दिसून येई. समोरच्या दातांत दोन सोन्याचे होते. ते चमकत.’ हीच या कादंबरीची नायिक हॅर्टा! तिचा चेहरा उदास, खिन्न. चक्रधरने पहिल्यांदा तिच्याकडे पाहिले तेव्हा तीही त्याच्याकडेच पाहात होती. मन्नानने तिच्याशी पूर्वीच गट्टी केली होती. चक्रधरचे दोन वर्षांपूर्वी पहिले प्रेम तुटले होते. आता तो हॅर्टाकडे टक लावून बघत होता आणि हॅर्टाही! मन्नान तिच्याशी लाडीगोडी करीत होता पण ती फारशी त्याला भीक घालत नव्हती.
थोड्याच अवधीत चक्रधरला समजते, बोटीवर बरेच प्रवासी ज्यू आहेत. आपला जीव वाचविण्यासाठी ते परमुलखात निघाले आहेत. हॅर्टाही त्यातलीच एक. यहुद्यांचे शिरकाण हा जर्मनीचा त्यावेळचा एकसूत्री कार्यक्रम असल्याने हे सारे ज्यू परमुलखात निघाले होते. हॅर्टासोबत तिची आईही आहे. बोटीवर काळे आणि गोरे असा भेद तेथील कर्मचारी वर्ग करताना दिसतो. त्यामुळे भोजनघरातील एका कर्मचाऱ्याची मानगुट चक्रधर धरतो आणि त्याला चांगलाच धमकावतो. हॅर्टावर या प्रसंगाचा एक वेगळा प्रभाव पडतो.
हॅर्टा आणि तिच्या आईजवळ फारसे पैसे नाहीत पण ती कमालीची स्वाभिमानी आहे. तिचे सामान सापडत नसल्याने तिच्या अंगावर दोन तीन दिवस झाले तरी एकच ड्रेस आहे. अंधारात चक्रधर डेकवर उभा असताना हॅर्टा येते आणि चक्रधरजवळ उभी राहते. दोघांमधल्या संभाषणाचा धागा प्रवास, अंधार, चांदणे येथपासून शांततेपर्यंत जाऊन पोहोचतो. डेकवरची ती शांतता आणि हॅर्टाची चक्रधरकडे असणारी स्नेहमयी नजर त्याने जणू वातावरण भारून गेल्यासारखे होते. चक्रधर तिच्या दृष्टीने सभ्य गृहस्थ असतो. चक्रधर विध्वंस हे नाव मात्र तिला अवघड वाटते. चक्रधर तिला त्याचे घरचे नाव बाबू आहे असे सांगतो, तेव्हा ती त्याला “बॉब’ म्हणूनच संबोधते.
हळूवारपणे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडू लागतात. त्या रात्री चक्रधरशी हॅर्टाची मैत्री झालेली असते. एव्हाना इटलीचे शेवटचे टोक “रेजिओ’ दिसायला लागते. पाणी संथ होते. हॅर्टा चक्रधरच्या आकंठ प्रेमात बुडालेली आहे. तिचे हळूवार चुंबन-आलिंगन, तिचे भुरभुरते केस हे चक्रधरच्या विस्मरणात जाणे आता शक्यच नाही. बोट रात्री दोन वाजता पोर्ट सैदाला पोहोचणार असल्याने प्रवाशांचा काहीसा विरस झाला आहे. पिआनोवर शिंदे संगीत वाजवताय आणि लुई त्यांच्या मांडीवर आहे. त्या संगीताच्या तालावर काही जोडपी नाचावयास लागली आहेत. शिंदे लुईला इंग्लिश बोलावयास शिकवीत आहे आणि तोही त्यांच्या प्रेमापोटी काही इंग्लिश शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करीत आहे.
आज हॅर्टाचा वेश मोठा सुरेख आहे. रेशमी पायघोळ झगा तिने घातला आहे. तिच्यासोबत मन्नान आहे, पण ती चक्रधरजवळ येऊन उभी राहिली आहे. मन्नानला ते तितकेसे आवडत नाही. चक्रधर काहीसा कठोर बोलतो, ते ऐकून मन्नान तिला घेऊन जातो. काही वेळाने ती पुन्हा परत येते आणि मी कशी दिसते असं चक्रधरला विचारते. तेव्हा चक्रधर, “तू माणसासारखं दिसतेस’ असं उत्तर देतो. तिला त्याचा आनंद होतो कारण गेल्या पाच-सहा दिवसांनंतर माणसात आल्यासारखं तिला वाटत असतं. पोर्ट सैदला सगळे खाली उतरतात, पण लुईच्या आईकडे पासपोर्ट नसल्याने तिला उतरता येत नाही. चक्रधर तिच्यासोबत थांबतो.
हॅर्टाच्या हातात अंगठी आहे. ती सांगते, ही अंगठी तिच्या पूर्वीच्या प्रियकराने दिली आहे. कार्ल फ्रांझ हे त्याचे नाव. तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो; पण तो जर्मन असल्याने त्याच्यावर नजर ठेवली जाते. हॅर्टा देश सोडून निघण्यासाठी आईसोबत स्टेशनवर येते तेव्हा कार्ल तिच्यासाठी कोणाच्यातरी हाती चिठ्ठी पाठवतो; पण पोलीस ती चिठ्ठी काढून घेतात. कार्ल तोंड लपवत स्टेशनवर वावरत असतो, पण तो ओळख दाखवत नाही. शेवटी हॅर्टाच त्याच्याजवळ जाते आणि तू दिलेले पत्र पोलिसांनी काढून घेतल्याचे सांगते. दोघेही एकमेकांकडे नि:शब्दपणे बघत राहातात. शेवटी निरोप न घेता हॅर्टाला गाडीत चढावे लागते. ते प्रेम सगळे स्वप्नच ठरते. नंतर कार्लचे काय झाले असेल या विचाराने तिचा आजही थरकाप होतो. कार्लच्या सहवासात पहिल्या प्रीतीचा जन्म तिच्यामध्ये झाल्याचेही ती सांगते. नाजूक प्रीती. गेला काळ त्यांनी हिंडण्या-फिरण्यात आनंदाने घालवला आहे.
हॅर्टाच्या आईचे आयुष्यही असेच ससेहोलपट होण्यातच गेले आहे. उपनगरात असणाऱ्या सुरेख घराला आग लागते. ती सगळी वस्तीच यहुद्यांची असते. सगळा विध्वंस होतो. नोकरी जाते. आईच्या मनावर परिणाम होतो. सगळे जुने जग जणू संपूनच जाते. हॅर्टावर या साऱ्या द्वंद्वाचा कमालीचा परिणाम होतो. बोटीवरचे वातावरण अधूनमधून काहीसे वादविवादाचे होते. वेगवेगळ्या वृत्तीचे वेगवेगळे लोक. स्त्री-पुरुष. मध्ये एकदिवस लुई आजारी पडतो, तेव्हा शिंदे त्याची रात्रंदिवस सेवा करतात. त्याला बरे वाटू लागते. पण आता चक्रधर आणि हॅर्टालाही ताप येतो. तशाही अवस्थेत ती चक्रधरच्या केबिनमध्ये येते. तिचे झोक जातात. चक्रधरवरचे तिचे प्रेम अकृत्रिम आहे. ती त्याची सेवा करायला आलेली असते. हळूहळू दोघांनाही बरे वाटते.
हिंदुस्तानचा किनारा आता जवळ येऊ लागतो. चक्रधरला मुंबईला उतरायचे असते. हॅर्टाला मात्र शांघायला जायचे असते. चक्रधरसोबत तिला उतरण्याची कमालीची इच्छा असते; पण परवानगी मिळत नाही. शेवटचा दिवस जवळ येतो आणि हॅर्टा ठरवून आल्यासारखी येते आणि चक्रधरला आपले सर्वस्व अर्पण करते. ती एक उत्कठ प्रीती असते. उद्याचे माहीत नाही, तेव्हा आज स्वत:साठी जगून घ्यायचे असते. अखेर मुंबई येते. चक्रधर शेवटच्या क्षणी मणामणाचे ओझे असल्यासारखा खाली उतरतो. हॅर्टा पुढे जाते. पुढच्या प्रत्येक बंदरावरून ती पत्र पाठवते. ती पत्रं कमालीची भावनाप्रधान असतात. तिच्या बॉबवर असणारे तिचे प्रेम ती शब्दाशब्दातून असीम उत्कटपणे व्यक्त करते. पण या साऱ्याची अखेर चांगली होत नाही. खरे तर चक्रधर हॅर्टाची ताटातूटच दु:खदायी असते. पण हॅर्टासारखी मनस्वी मुलगी ही ताटातूट वेगळ्या पद्धतीने झुगारते. ती हॉंगकॉंगला समुद्रात उडी मारून मृत्यूला सामोरी जाते. कारण तिला आता अधिक दु:ख पेलण्याची खरे तर शक्तीच उरत नाही. एक अत्यंत वेगळ्या शैलीने सिद्ध केलेली ही कादंबरी आजही “शोकांतिका’ म्हणून वाचक वाचतात आणि या कादंबरीच्या प्रेमात पडतात.
पुस्तकातील माणसं
डॉ. विनोद गोरवाडकर