जीवन म्हटले की, त्यात संघर्ष हा आलाच. जगात कोणतीही अशी व्यक्ती नाही की जिच्या वाट्याला अपयश, कसोटी किंवा संघर्ष आलेला नाही. मनुष्याकडे कितीही भौतिक सुखसाधने असली तरी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होईलच असे नाही. प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या ही भिन्न असते. कोणाला कोणत्या गोष्टीतून खरा आनंद मिळेल हे निश्चित सांगता येणार नाही.
आपल्या आयुष्यात येणारे प्रसंग हे नेहमीच चांगले आणि आपल्या हिताचे असावेत, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो; परंतु प्रत्येकवेळी आपल्या मनाप्रमाणे होईलच असे नाही. अपयश, निराशा, भय, अपमान आणि संकटे ही आपल्या जीवनात विविध प्रसंगातून येत असतात. या अशा प्रसंगांना स्वीकारून, त्यांना सामोरे जाऊन स्वतःला सिद्ध करणे हा दृष्टिकोन यशाकडे नेणारा आहे.
असे म्हणतात, जे होतं ते आपल्या भल्यासाठीच. मग त्यातून येणारे निष्कर्ष काहीही असो. आयुष्यात येणारे प्रतिकूल प्रसंग हे त्यातून अजून काहीतरी चांगले घडणार आहे, याचे संकेत देणारे असतात. फक्त ते स्वीकारण्याची आपली तयारी असायला हवी. जेव्हा आपण आयुष्याच्या खडतर कालावधीतून जात असतो तेव्हा त्यातून निष्पन्न होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण तयार असायला हवे. मग ती आपल्या मनाप्रमाणे असू किंवा मनाविरुद्ध. अशावेळी आपला आपल्या कार्यावर आणि क्षमतेवर गाढ विश्वास असायला हवा.
आपल्यासमोर येणाऱ्या कठीण प्रसंगावेळी अनेक जण नैराश्यात जातात. अगदी खंबीर लोकही अशा प्रतिकूल प्रसंगांनी खचून जातात. मग त्यात नातेसंबंधातील वितुष्ट, अपयश, आपल्याबद्दल निर्माण झालेला गैरसमज, व्यवसायातील तोटा आणि इतर अनेक अनेक प्रतिकूल प्रसंग आत्मविश्वास डळमळीत करतात. याने लोक सैरभैर होतात. व्यसनाच्या आणि वाईट सवयींच्या आहारी जातात. न्यूनगंडाच्या भावनेतून जीवघेणे मार्ग पत्करतात. या गोष्टी बदलण्यासाठी आपला अशा प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सामान्य आणि असामान्य लोकांमध्ये हाच मुख्य फरक असतो. सामान्य लोक अशा प्रसंगापुढे शरणागती पत्करतात, तर असामान्य लोक त्यातून बोध घेऊन त्यापेक्षा अधिक उत्तम संधीचा शोध घेतात. मोठे लोक मोठमोठ्या समस्यांना छोटे बनवतात व त्यापासून काहीतरी चांगले घडवून आणतात, तर छोटे (विचाराने) लोक किरकोळ प्रसंगाना मोठे बनवून स्वतःला मानसिकदृष्ट्या खच्ची करीत असतात.
आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला योग्य वृत्तीने हाताळता आले पाहिजे. जे होतं ते आपल्या भल्यासाठीच हा दृष्टिकोन मनात बाळगायला हवा. आज आपण व्हॉट्सऍप हे मेसेजिंग ऍप वापरतो. या व्हॉट्सऍपचा शोध ब्रायन ऍक्टन या सॉफ्टवेअर इंजिनियरने लावला. आज जगभरात सर्वात लोकप्रिय मेसेजिंग आणि कॉलिंगऍप म्हणून वापरले जाते. या ब्रायन ऍक्टनने एकेकाळी आपला सहकारी जॅन कोम याच्यासोबत फेसबुक आणि ट्विटर या जगप्रसिद्ध कंपन्यांकडे नोकरीसाठी अर्ज केला होता आणि त्यावेळी या दोन्ही कंपन्यांनी या दोघांनाही सपशेल नाकारले होते. 2007 साली नोकरीसाठी नाकारल्याने या दोघांनी पुढे 2009 मध्ये कॅलिफॉर्नियातील सिलिकॉन व्हॅली येथे व्हॉट्सऍपची निर्मिती केली. अल्पावधीतच त्यांच्या या ऍपला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढे त्याची लोकप्रियता जगभरात इतकी वाढत गेली की 2017 मध्ये फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने व्हॉट्सऍप खरेदी केले. होय, हीच ती फेसबुक कंपनी जिने ब्रायन ऍक्टन आणि जॅन कोम यांना एकेकाळी नोकरी देण्यास नाकारले होते. मात्र या दोघांनी अजिबात हार मानली नाही. संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी थांबणे किंवा खंत व्यक्त करणे पसंत केले नाही. आपले प्रयत्न सुरू ठेवले. फेसबुकने त्या दोघांना नाकारले हे एका अर्थाने चांगलेच झाले. कारण “जे होते ते भल्यासाठीच’ या गोष्टीचा प्रत्यय यामुळे जगाला मिळाला. जर फेसबुकने ब्रायनला कामावर घेतले असते तर जग कदाचित व्हॉट्सऍपला मुकले असते.
जीवनात कधी, कुठे आणि केव्हा कोणाला संधी मिळेल हे सांगता येत नाही; परंतु यश हे आज ना उद्या मिळतच असते. आज अनेक यशस्वी लोक हे नकार, अपयश पचवून यशाच्या शिखरावर विराजमान आहेत, ते त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे. आपले ध्येय साध्य करण्यासाठी जगातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्वांना अनेक अडचणी, अपयश आणि निराशाजनक परिस्थितीला सामोरे जावे लागल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, एवढे होऊनही आज ते आपल्या यशाची उंची टिकवून आहेत, ते “जे होते ते भल्यासाठीच’ या वृत्तीचा अंगीकार केल्यामुळे.
नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या आयुष्यात येणारे कठीण प्रसंग हे आपली क्षमता द्विगुणित करण्याच्या उद्देशानेच येत असतात. म्हणूनच त्यातून पुढे काहीतरी भव्यदिव्य होणार आहे याचे संकेत ते देत असतात. यासाठी गरज असते ती आपण खंबीर राहण्याची आणि आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात करण्याची. जे होणार आहे ते नक्कीच आपल्या हिताचेच असणार आहे, यावर आपला ठाम विश्वास असायला हवा.
व्यक्तिमत्त्व
सागर ननावरे