मुंबई : राज्यातील राजकारण मागच्या १५-२० दिवसात पूर्णपणे बदलून गेले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा स्वीकार केला. दरम्यान या सर्व घडामोडीत भाजपाच्या नेत्यांनी फडणवीस सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्यसंस्थांमधील निवडणुकींसंदर्भात घेण्यात आलेले निर्णय लागू करण्याची मागणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने संरपंच आणि नगराध्यक्षांची निवड पुन्हा थेट जनतेमधून करण्याची तसेच महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेत बदल करण्याचे संकेत दिले जात आहेत. याच मुद्दयावरून आता मनसेनी दंड थोपटले आहे.
पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंनी शिंदे सरकारला आव्हान दिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनापासून पुन्हा चर्चेत आलेल्या वसंत मोरेंनी ट्विटरवरुन थेट शिंदे सरकारला आव्हान दिले आहे. “सरकार बदलले, असं ऐकतोय. प्रभाग रचनाही बदलणार आहात म्हणे. सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार,” असे म्हणत मोरे यांनी एक ट्विट केले आहे. पुढे ते म्हणतात, “माझे सरकारला एक आव्हान आहे. हिंमत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच असेल.”
सरकार बदलले.
असे ऐकतोय प्रभाग रचनाही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार. माझे सरकारला एक आव्हान आहे, हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर मनसेचाच असेल …#पुणे— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) July 7, 2022
मोरेंनी केलेली मागणी मान्य करणं सध्याच्या नियमांनुसार सरकारला शक्य नसलं तरी यावर भाजपा आणि शिंदे समर्थक गटाकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले होते. मात्र आता मोरेंनी थेट सरकारविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.