भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 5 जून 1879 रोजी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे झाला.(निधन 30 मे 1955). त्यांचे प्राथमिक शिक्षण व वेदाध्ययन गोरेगाव येथेच पार पडले. ते 1893 मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक व डेक्कन कॉलेजातून बीए पदवी मिळविल्यानंतर त्यांनी दुष्काळपीडितांसाठी काढलेल्या सरकारी अन्नसत्रात सहा महिने अहमदनगर येथे काम केले. त्यानंतर 1901-1910 या काळात अहमदनगर, पुणे, मुंबई व रत्नागिरी येथे खासगी व शासकीय विद्यालयांमधून अध्यापन केले.
समाजसेवा करण्याच्या हेतूने ते “भारतसेवक समाज’ या संस्थेचे सदस्य झाले. या संस्थेच्या “ज्ञानप्रकाश’ या मराठी दैनिकाचे व्यवस्थापक म्हणून काम करू लागले. वर्ष 1911 मध्ये ज्ञानप्रकाशची मुंबई आवृत्ती काढण्याचे ठरल्यामुळे जोशींना मुंबई येथे जावे लागले. वर्ष 1911 मध्येच त्यांनी “सामाजिक सेवा संघ’ ही संस्था स्थापन केली. वर्ष 1955 पर्यंत या संस्थेच्या कार्याशी जोडलेले होते. त्यांनी वर्ष 1911-13 या काळात दुष्काळपीडितांसाठी साहाय्यनिधी गोळा केला. मुंबईत काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले. जोशींनी आपले सर्व लक्ष कामगार समस्यांवरच केंद्रित केले. त्यांनी मुंबईतील कामगार वस्त्यांमध्ये जागृती करण्यासाठी अनेक कल्याणकेंद्रे, रात्रशाळा, मोफत वाचनालये, वैद्यकीय केंद्रे, औद्योगिक प्रशिक्षणवर्ग असे अनेक उपक्रम चालविले. कामगारांना एकत्र येण्यासाठी दोन मोठी सभागृहे बांधली. 1917 साली भारत सरकारतर्फे मेसोपोटेमियाला भेट देणाऱ्या पत्रकार प्रतिनिधीमंडळाचे ते एक सदस्य होते. वर्ष 1921 साली त्यांनी कामगार समाचारनामक एक मराठी साप्ताहिक सुरू केले.
वर्ष 1919 मध्ये वॉशिंग्टन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या पहिल्या परिषदेस भारत सरकारने कामगारवर्गाचे प्रतिनिधी म्हणून जोशींची नियुक्ती केली. अशा कामगारविषयक परिषदांच्या निमित्ताने 1922-48 या काळात जोशींनी सोळा वेळा युरोपीय देशांना भेटी दिल्या व भारतीय कामगारांच्या दुःस्थितीकडे जगाचे लक्ष वेधले. लंडन येथे भरलेल्या तीन गोलमेज परिषदांवर तसेच संयुक्त संसदीय समितीवर जोशींना सरकारने नेमले होते. भारतीय राष्ट्रीय नियोजन आयोगाच्या कामगार उपसमितीचे ते अध्यक्ष होते. मुंबई महानगरपालिकेचे सदस्य व रेल्वे कामगार महासंघाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले. दिल्लीच्या मध्यवर्ती विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून 1921-47 एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी काम केले. ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांना “विधानसभेचे पिता’ अशी सन्मान्य पदवी मिळाली.
जोशी 1948 मध्ये कामगार संघटना क्षेत्रातून निवृत्त झाले. 1951 मध्ये कराची येथे भरलेल्या पहिल्या आशियाई कामगार संघटना परिषदेने कामगार संघटनांचा ज्येष्ठ नेता या नात्याने त्यांना अध्यक्षपद देऊन गौरविले. त्यांनी उर्वरित आयुष्यात अनेक कामगार संघटनांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये मुंबईची “ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन’ ही विशेषकरून होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या संघटनेतर्फे दरवर्षी एक व्याख्यानसत्र आयोजित केले जाते.
माधव विद्वांस