पिंपरी – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज एक महिना पूर्ण होत आहे. या संपामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वल्लभनगर आगाराला गेल्या महिनाभरात 2 कोटी 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगारातील नाशिक फाटा येथून सोडण्यात येणाऱ्या 2 शिवशाही बस वगळता अन्य बस जागेवरच उभ्या आहेत.
वल्लभनगर आगारातून गेल्या महिनाभरात एकही एसटी बस धावलेली नाही. आगारातून सोलापुर, कोल्हापूर, पणजी, मुंबई, नाशिक, कोकण अशा विविध मार्गांवर बस सोडण्यात येतात. 49 बसेसच्या दिवसभरात 55 ते 60 फेऱ्या होतात.
नोव्हेंबर महिन्यात वल्लभनगर आगाराला दिवाळीच्या कालावधीत दररोज 9 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. दिवाळी संपल्यानंतर 8 तारखेपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाले. वल्लभनगर आगाराला दररोज सरासरी 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यानुसार गेल्या महिनाभरात एसटीचे 2 कोटी 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.