नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेच्या निकालात टॉप-3 मध्ये फक्त मुलींचा समावेश आहे. श्रुती शर्माने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक अंकिता अग्रवाल, तृतीय क्रमांक गामिनी सिंगला आणि चतुर्थ क्रमांक ऐश्वर्या वर्माने मिळवला आहे.
टॉपर श्रुती शर्माची यशोगाथा –
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी असलेल्या श्रुती शर्माने UPSC नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून कुटुंबाचे नाव उंचावले आहे. निकालावर प्रथमदर्शनी अभिप्राय देताना, श्रुती शर्मा तिच्या यशाचे श्रेय या प्रवासात तिच्यासोबत असलेल्या सर्वांना देते. तिने कुटुंब आणि मित्रांचे आभार मानले आहेत ज्यांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला आहे.
श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिने जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेंशियल कोचिंग अकादमीमध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी केली होती. हे यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक असल्याचे तिने सांगितले.
श्रुती शर्माने सांगितले की, ती या निकालाने आश्चर्यचकित झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून ती सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होती. श्रुती शर्माचे आयएएस होण्याचे स्वप्न आहे. तिला भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे आहे.
जामिया मिलिया इस्लामिया रेसिडेन्शियल कोचिंग अकादमी (RCA) ला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक यांसारख्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि निवासी सुविधा देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे निधी दिला जातो. जामियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की कोचिंग अकादमीच्या 23 विद्यार्थ्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, या परीक्षेत एकूण 685 उमेदवारांची निवड झाली आहे. आयएएस, आयपीएस आणि आयएफएस पदांच्या निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते.
UPSC परिक्षेत द्वितीय क्रमांक मिळविणारी टॉपर अंकिता म्हणाली की, मला द्वितीय क्रमांक मिळाल्याने खूप आनंद होत आहे. मी IAS ची निवड केली आहे आणि सेवेत रुजू झाल्यानंतर महिला सक्षमीकरण, प्राथमिक आरोग्य आणि शालेय शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. अंकिताची पहिल्याच प्रयत्नात IRS (भारतीय महसूल सेवा) मध्ये निवड झाली होती. आणि आता तिसऱ्या प्रयत्नात केवळ आयएएसची निवड झाली नाही तर नागरी सेवा परीक्षेत देशात दुसरी टॉपर बनून इतिहासही रचला आहे.