मुंबई – आज जे विषय महत्त्वाचे नाहीत असे विषय काढून देशात सगळ्याच ठिकाणी वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत. राम जन्म किंवा हनुमान जन्म कुठे झाला? यापेक्षा आज महागाई, बेरोजगारी, टंचाई, कोरोना असे अनेक महत्त्वाचे विषय आहेत.
हनुमानाचा जन्म कुठे झाला? हा वाद अनावश्यक आहे. मला वाटतं याला फार महत्त्व देऊ नये. यातून कायदा व सुव्यवस्थेचा काहीच प्रश्न निर्माण होणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे गृहमंत्र्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
तसेच, कर्नाटकच्या आमदाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा हा राष्ट्रीय ध्वज करण्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना गृहमंत्री म्हणाले की, भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे आणि राहील. कुणी काहीही म्हटले तरी भारतीय नागरिक हा तिरंगाच राष्ट्रध्वज राहावा यासाठी प्राणपणाने लढेल.