उत्तर प्रदेशात आघाडीला 300 हून अधिक जागा मिळण्याचा विश्वास
लखनौ: चाचण्या काहीही म्हणोत; उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव निश्चित आहे. आमची आघाडी विधानसभेच्या 403 पैकी 300 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झाले. त्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल्स) निष्कर्ष जाहीर होण्याआधी अखिलेश यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी मतदानाआधी जाहीर झालेले जनमत चाचण्यांचे निष्कर्ष अमान्य केले.
ते निष्कर्ष भाजपला अनुकूल आहेत. त्याचा संदर्भ घेऊन अखिलेश म्हणाले, निकालाच्या दिवशी (10 मार्च) भाजप उत्तर प्रदेशच्या सत्तेतून बाहेर पडलेला दिसेल. सपच्या नेतृत्वाखालील आघाडी स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल.
महागाई, बेरोजगारीमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून आणि विकासासाठी जनतेने मतदान केले आहे, असा दावाही त्यांनी केला. भाजपने प्रचार मोहिमेवेळी सपला आणि विशेषत: अखिलेश यांना लक्ष्य करताना घराणेशाहीचा मुद्दा लावून धरला. मात्र, भाजपमध्येच सर्वाधिक घराणेशाही असल्याचा पलटवार अखिलेश यांनी केला.