महाराजगंज – पंतप्रधान मोदी आणि अन्य भाजप नेत्यांनी सातत्याने कॉंग्रेसने 70 वर्षांत काय केले असा प्रश्न उपस्थित केला आहे. तथापि, आज मोदी सरकार देशाची जी संपत्ती विकत आहेत ती कोणी निर्माण केली असा प्रतिसवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. त्यांनी येथील जाहीर सभेत बोलताना म्हटले आहे की, एअरपोर्ट, बंदरे, रेल्वे ही सारी कॉंग्रेसने उभी केलेली मालमत्ता होती. ती तुम्ही विकून टाकली आहे. आपल्याच मित्रांना तुम्ही ती कवडीमोल भावाने दिली आहे, असा आरोप त्यांनी केला.
मोदी सरकारची सारी नीती केवळ त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या हितासाठी असते, गोरगरिबांना, बेरोजगारांना त्यात काही स्थान नसते असे त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशातील लोकांची स्थिती अत्यंत भीषण असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या की ललितपूरमध्ये खताच्या लाइनमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. लोकांना खतेही मिळणे येथे अवघड झाले आहे.
मोठ्या कष्टाने शेती पिकवली तर धान्याला चांगला भाव मिळत नाही. नोटाबंदी जीएसटीमुळे दुकानदार व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. बेरोजगारामुळे हतप्रभ झालेल्या युवकांना धर्म आणि जातीच्या नावाने लढवले जात आहे. या लोकांना आता मतदारांनीच धडा शिकवल्या शिवाय राज्यात परिवर्तन किंवा विकास होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील 12 लाख सरकारी पदे रिक्त आहेत. या पदांवरील भरतीला चालना देण्याची गरज असून आम्ही हे काम करू. अंगणवाडी महिलांच्या मानधन वाढीकडे कोणीही लक्ष दिले नाही, आम्ही त्यांना दहा हजार रुपयांचे मानधन देऊ. भटक्या जनावरांसाठी छत्तीसगड सरकारने चांगली योजना राबवून तो प्रश्न सोडवला आहे. तीच योजना आम्ही या राज्यात राबवू असेही त्यांनी म्हटले आहे. येथे भटक्या गायींचे लचके कुत्री तोडत आहेत, काही ठिकाणी जिवंतपणेच गायी पुरल्या जात आहेत या स्थितीवर सत्ता परिवर्तन हाच उपाय आहे असेही त्यांनी म्हटले आहे.