– वरुण ग्रामोपाध्ये
भारताची अर्थव्यवस्था कोसळू नये, यासाठी सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु काही लोकांना अपूर्ण माहिती मिळाली असल्याने दीर्घ काळाने पुढे येणारे नुकसान झाले आहे, ते कसे?
ही गोष्ट 2016 ची. रोहित नावाचा एक मुलगा गावाकडून शहरात पोचलेला हुशार मुलगा; त्याच्या गावाची शान आहे. दहावीत एकूण 95 टक्के मार्क त्याने मिळवले, तेही कोणतीही ट्युशन न लावता. मग पप्पांनीही अडवल नाही. त्याने सायन्सच्या अगदी मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. पण महागड्या फीचं काय? त्याला शैक्षणीक कर्ज लगेचच मिळालं, ज्याचे हप्ते शिक्षण पूर्ण झाल्यावरच सुरु होणार होते. म्हणजे निदान कॉलेजची चार वर्ष तरी चिंता नाही. याच आनंदात रोहितच्या वडीलांनी कुठूनतरी पैशाची सोय केली आणि रोहितसाठी एक नविन स्पोर्टस बाईक घेऊन दिली. त्यासाठी 25 टक्केच तर “टोकन अमाउंट” भरावी लागली होती. मागच्याच वर्षी रोहितच्या बहिणीचेही लग्न अगदी थाटामाटात केले होते, आणि जावईबापुंना नवी कोरी “इंडिका” घेउन दिली. मुलीला काय अशीच मोकळ्या हाताने पाठवणार होते होय पप्पा? तशी त्यासाठी रोहितने खास सुट्टी पण घेतली होती.
रोहितला मागच्या वर्षीच जुनमध्ये पदवी मिळाली, आणि तो उत्साहाने कामावर रुजू झाला. तेवढ्यात आले लॉकडाउन. नोकरीचे राहिले बाजूलाच, घरी जायचीही सोय नव्हती. कसेबसे दिवस काढले पोराने, आणी गावी परतला. त्याने वाचवलेले पैसे मात्र दरम्यानच्या काळात संपले. गावी शेती होती, आणि काम भरपुर. पण एकट्या-दुकट्यानेच राबुन किती व्हायचे? कोणाला वाटलं होतं असं काही होईल म्हणून?
पप्पांनी सांगितलं, “रोहित, आता इतक्यात काही शहराकडे जायचे नाही.’
सांगणे सोप्पे, करणे कठिण. आता तर कर्जाच्या हप्त्यांसाठी बॅंकेचे फोनही येऊ लागले. त्यावर मात कशी करायची असा प्रश्न पडला आणि समस्येचा डोंगर उभा राहिला. आता वरील गोष्टीत बोला कर्ज किती? एक? दोन? अहो चार कर्ज आहेत तब्बल.
पहिले रोहितच्या शिक्षणाचे, मग त्याच्या गाडीचे, पुढे दीदीच्या लग्नाचे, आणि जावईबापूंच्या “इंडिका’चे. या प्रकारास “लोन स्टॅकिंग’, असे म्हणतात. नको नको म्हणता कर्जाचा डोंगर उभा राहतो या लोन स्टॅकिंगने. इथे डोकावते ते आर्थिक व्यवस्थापन. आपली अज्जी सांगायची ते आता बरोबर वाटू लागले आहे. संकट कधी सांगून येत नाही, आणि गाठीला ठेवलेले पैसे कधी वाया जात नाहीत. सध्याच्या परिस्थितीत सर्व बॅंकांना पाच प्रकारची कर्जबुडीची भीती सतावत आहे.
1.वैयक्तिक कर्ज- हे कर्ज पूर्णपणे विश्वासावर दिले जाते. कर्जदाराची कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता दिल्या गेल्याने हे बॅंकेसाठी सर्वात धोकादायक गुंतवणुक मानली जाते. एनपीए (नॉन परफॉर्मिंग ऍसेट) होणाऱ्या कर्जामध्ये अशा वैयक्तिक कर्जाचा समावेश सर्वाधिक आहे.
2. शैक्षणिक कर्ज- उच्च शिक्षण घेण्यासाठी हे कर्ज दिले जाते. कर्जदाराच्या वडिल, अथवा जोडीदाराच्या उत्पन्नाचा पुरावा पाहून, व उत्पन्न धारकाकडून कर्जपूर्तीची हमी मिळवून हे कर्ज दिले जाते. बहुतांश लोकांना हे माहितच नसते की, या कर्जप्रकारात जरी हप्ते उशीरा सुरु होत असले, तरी व्याज हे कर्ज घेतल्या दिवसापासूनच आकारले जाते.
3. व्यावसायिक कर्ज- व्यवसायाद्वारे अर्थार्जन करण्याच्या अनुषंगाने घेतलेल्या कर्जास व्यावसायिक कर्ज हे नाव दिले जाते. हे कर्ज घेण्याकरिता एका सुयोग्य जामिनदाराकडून कर्जाच्या परतफेडीसाठी वैयक्तिक ग्वाही घेतली जाते. तरी देखील दशकाच्या शेवटी येणाऱ्या आर्थिक मंदीमध्ये कोविड-19 ची भर पडल्याने हे कर्जही धोकादायकच मानले गेलेले आहेत.
4. ओव्हरड्राफ्ट- वेगवान धावणाऱ्या बाजाराला कोविड-19 चा ब्रेक लागल्याने, व्यावसायिकांना दिलेली कर्जाची ओव्हरड्राफ्ट सुविधा देखिल आता बॅंकेकडून धोकादायक मानली गेली आहे. या सुविधेमागे कोणत्याही प्रकारचे तारण गरजेचे नसते, व कोविड-19 मुळे आलेली अस्थिरता परतफेडीच्या संभाव्यावर प्रश्न उभे करत आहे.
5. क्रेडिट कार्ड- क्रेडिट कार्ड हे जरी सेक्युअर्ड लोन मानले जात असले, तरीही त्यातील कर्जबुडीची शक्यता कोविड-19 मुळे वाढल्याचे आढळुन आले आहे. देशातील बेरोजगारी तब्बल 23.52 टक्के असून ही टक्केवारी वाढत जाण्याची शक्यता आहे. बॅंकेच्या क्रेडिट कार्ड संबंधीच्या अंदाजामध्ये बेरोजगारीचा विचार केलेला दिसून येत आहे.
आम्ही काय करावे?
सदरच्या काळात समोर आलेल्या धक्कादायक बाबी जरी नविन नसल्या तरी त्यावर आता उपाय मात्र नविन आहेत.
1. परतफेडीची शिस्त- आरबीआयच्या आदेशा नुसार अवलंबलेल्या 3+3 महिन्यांचे अधिस्थगन (मोरॅटोरियम) ही जरी आनंदची बातमी वाटत असली तरी त्याची वाईट सवय मात्र लागू देऊ नका. लक्षात ठेवा, आपण ती रक्कम अजुनही देणं लागताच. शिवाय, त्या महिन्यांचे व्याजही माफ केल्याचेही गैरसमज पसरु लागले आहेत. तसे काही नसून ते व्याज आपल्यावर लागू होणारच आहे. अशा परिस्थितीत जमेल तेव्हा जमेल तेवढी रक्कम कर्जाच्या मुदलात टाकणेच शहाणपणाचे ठरेल.
2.आधुनिक गुंतवणूक- वाढत्या महागाईच्या दरापुढे पारंपारिक गुंतवणुकी फिक्या पडू लागल्या आहेत. भारताचा महागाईचा दर वर्ष 2020-21 मध्ये 5.81 टक्के मानण्यात आला असून वार्षिक मुदतबंद ठेवीचा सर्व्वोच दर 7.50 टक्के आढळुन येत आहे. अशा काळात परिणामी बचत कमाई दर हा 1.69 टक्के दिसून येत आहे. त्यात वाढत्या कर्जाचीही चिंता चुकीची नाही. मग आधुनिक गुंतवणूक, जसे की म्युच्युअल फंड, शेअर, डेट इनस्ट्रुमेंट (उदा. डिबेंचर) इत्यादी हाच सुवर्ण मार्ग दिसत आहे. कमाई आणि नियमित गुंतवणूक असूनही जीवनशैली किमान खरचाची राखल्यास मदत होऊ शकते.
3. जीवनशैलीची कुशल हाताळणी- कोविड 19 येताना फक्त आपल्या शारीरिक स्वास्थ्य नव्हे तर आर्थिक स्वास्थ्यावरही प्रश्नचिन्ह घेऊन आला आहे. अशा वेळी बजेट आणि बचत या दोन्ही बाबी समान मोलाच्या. फक्त वायफळ खर्च थांबवून काम होणार नाही, तर प्रत्येक उत्पन्न आणि खर्चाची नोंद ठेवणे, व प्रत्येक पै वर व्याज मिळेल याची सोय करणं हेच महत्वाचे आहे.
रोहित व त्याच्या वडिलांनी जर ही काळजी वेळीच घेतली असती तर त्याच्यावर लोन स्टॅकींगची आपत्ती ओढवली नसती.
– वरुण ग्रामोपाध्ये