उत्तर प्रदेशातील प्रचार सभेत मोदींचा आरोप
महाराजगंज – विरोधकांनी देशात नकारात्मक राजकारण चालवले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विरोधकांनी कोविड लसींबाबतही लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले आहे. असा आरोप त्यांनी आज येथील प्रचार सभेत बोलताना केला.
पंतप्रधान म्हणाले की, असंख्य भारतीयांना लसी भारतात बनवल्या गेल्या हे जाणून अभिमान वाटला, पण त्यांना डोस न घेण्यास विरोधकांनी चिथावले. विरोधकांनी शंका निर्माण करून लसीबाबत भीती वाढवण्याचा प्रयत्न केला. भारताने आपल्या नागरिकांना 200 कोटी लसीचे डोस मोफत दिले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
पंतप्रधान म्हणाले की, जग सध्या अनेक आव्हानांमधून जात आहे. या परिस्थितींपासून कोणीही दूर राहू शकत नाही. या घटनांचा जगातील प्रत्येक नागरिकावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत भारताने खंबीर राहिले पाहिजे आणि ही सर्वात मोठी गरज आहे असे ते म्हणाले.
शेतीपासून लष्करापर्यंत, समुद्रापासून अंतराळापर्यंत, भारताला प्रत्येक क्षेत्रात सामर्थ्यवान बनायचे आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून उत्तर प्रदेशवरही मोठी जबाबदारी आहे असे त्यांनी नमूद केले.