पिंपळे गुरव – माहेश्वरी चौक येथील महापालिकेच्या अहिल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट येथे गुरुवारी (दि. 13) रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे सुरक्षा भिंतींवरील लोखंडी बार, पत्रे निखळून पडले आहेत. सुरक्षा भिंतींवर लावण्यात आलेले लोखंडी बार व पत्रे येथे येणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. ये-जा करताना एखाद्याच्या अंगावर पडून अपघाताचा धोका आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विधी घाटाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकात पवना नदी किनारी महापालिकेचे अहिल्याबाई होळकर दशक्रिया विधी घाट परिसर आहे. याला लागूनच महापालिकेचे कचरा निर्मूलन संकलन केंद्र आहे. या दोघांमध्ये सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. या सुरक्षा भिंतींवर लोखंडी बार उभारून पत्रे टाकण्यात आले होते. ज्या लोखंडी बारवर पत्रे लावलेले आहेत, ते पूर्णपणे गंजून गेले आहेत. त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हे पत्रे तुटून पडले आहेत. मात्र गुरुवारी रात्री अचानक सुसाट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सुरक्षा भिंतींवर लावण्यात आलेले लोखंडी बार व पत्रे निखळून धोकादायक अवस्था निर्माण झाली आहे. एखादी दुर्घटना घडून अनर्थ होऊ शकतो. महापालिका ठेकेदाराकडून काम करून घेत असताना संबंधित अधिकाऱ्याने कामाच्या दर्जाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना कुठेच दिसत नसल्याने ही परिस्थिती ओढवत आहे, हे मात्र नक्की.
नागरिकांना अपघाताचा धोका
जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरातील नागरिक येथील घाटावर दशक्रिया विधीसाठी येतात. या वेळी आप्तेष्ट, नातेवाईक आदी परिसरातून येणारे मित्र परिवार, महिला येत असतात. या वेळी ये-जा करताना येथील धोकादायक लोखंडी बार व पत्रे एखाद्याच्या अंगावर पडून अपघात घडू शकतो. याकडे संबंधित महापालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष न करता निखळून पडलेले लोखंडी बार व पत्रे काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापालिका शहरात विविध ठिकाणी विकासकामे करत आहेत. परंतु ही विकासकामे किती दर्जेदार होत आहेत याची पाहणी आयुक्तांनी करावी. जुन्या कामांचे ऑडिट करून त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा घटना घडू शकतात. महापालिकेने येथील दशक्रिया विधी घाटाचे पत्रे व इतर कामे त्वरित करावेत.
– स्थानिक नागरिक