मुंबई – आमश्या पाडवी हे आज शिवसेनेत आले आहेत. बुधवारपर्यंत रोज नवनवे धमाके होतच राहणार आहेत, असा दावा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे.
तर काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कात झाला आहे. आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
शिरसाट म्हणाले, शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकण्याची आम्हाला सवय आहे. त्यात काँग्रेसच्या मंचावर आज उद्धव ठाकरे बसले आहेत. हा आमच्यासाठी काळा दिवस आहे.
काँग्रेस धोकादायक आहे, असे स्वर्गीय बाळासाहेब बोलायचे. आज उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसतात, हे दुर्दैवी आहे. काँग्रेससोबत बसणे हे उद्धव ठाकरे गटाचे पाप आहे.
जागावाटपाबाबत ते म्हणाले, आम्ही काही जागांची अदलाबदली करणार आहोत. महायुतीचा तिढा सुटला आहे. उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री दिल्लीला जाण्याइतके प्रकरण गंभीर नाही. योग्य पद्धतीने जागा वाटप झाले आहे, असा दावाही त्यांनी केला.
राऊत काँग्रेसमध्ये जातील –
संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये जातील. राहुल गांधींसोबत फक्त संजय राऊतचे फोटो लागतात. संजय राऊत यांची राजकीय महत्त्वकांक्षा वेगळी आहे. तुम्हाला नॅशनल राजकारणात कोण विचारते का?, असा थेट सवाल संजय शिरसाटांनी केला आहे.