वडूज/कातरखटाव -करोनाच्या काळात कमी झालेले दुधाचे दर सरकारने वाढवून द्यावेत, या मागणीसाठी कातरखटावमधील शेतकऱ्यांनी मंगळवारी अनोखे आंदोलन केले. कातरखटाव येथील मंदिरात महादेव व नंदीच्या मूर्तीस अभिषेक करून गोरगरीबांना दूध वाटण्यात आले.
शेतकरी संघटनेचे कातरखटाव विभागाचे अध्यक्ष वैभव पाटील, प्रगतिशील शेतकरी अजय पाटील, योगेश बागल, शुभम बोडके, अमोल बागल, समीर डांगे, दस्तगीर डांगे, आझाद मुल्ला उपस्थित होते. वैभव पाटील म्हणाले, कोरोनामध्ये सामान्य जनतेला हाल सोसावे लागत आहेत. दुधाचे दर फार कमी झाले तरी पशुखाद्य, खते, अवजारांच्या किमती, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. तीस रुपये दर असलेले दूध आता 18 ते 19 रुपयांनी विकावे लागत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात दूध खरेदी बंद आहे. मी स्वत: पुणे येथील नोकरी सोडून दहा गायी सांभाळत गावी दुग्ध व्ययसाय सुरू केला; परंतु दुधाचे दर कोसळल्याने आमचे कंबरडे मोडले आहे. शेती व दूध व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्तेही भागत नाहीत.
मोठ्या डेअरींनी दुध दरासाठी बंद पाळला आहे. शासनाने गायीच्या दुधाचा दर 25 रुपये करावा. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन आंदोलनात करण्यात आले. दूध दराबाबत युवकांनी घोषणाबाजी केली.