नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेलेलं असताना भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. यामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा आता १७१ वर गेला आहे. अशातच देशाचे केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
अश्विनी कुमार चौबे माध्यमांशी बोलतांना म्हणाले की,’सर्वांनी 15 मिनिटे उन्ह घ्यायला हवे. यामुळे आपल्या शरिराला व्हिटॅमीन ‘डी’ मिळते. तसेच यामुळे कोणताही व्हायरस नष्ट होतो. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादंगाला सुरुवात झाली आहे. सध्या सोशल माध्यमांमध्ये त्यांच्या या विधानाचा व्हिडियो चांगलाच वायरल होत असून त्यांची नेटकऱ्यांकडून चांगलीच शाळा घेतली जात आहे.
तत्पूर्वी, कोलकात्यामध्ये भाजपचा स्थानिक कार्यकर्ता नारायण चटर्जी याने, गोमूत्र प्यायल्याने कोरोना विषाणूची लागण होत नाही. तसंच ज्याला कोरोनाची लागण झाली आहे ती व्यक्ती सुध्दा बरी होते असा दावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी चटर्जींना अटक केली आहे. तर आपल्या देशात कोरोनाचा काहीही परिणाम होणार नाही. कारण येथे ३३ करोड देवी-देवता राहतात. या विधानामुळे कैलास विजयवर्गीय काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले होते.