पिंपरी – लोकसभा निवडणूकीसाठी दोन जागांचा आग्रह एनडीएकडे धरणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढणार आहे. मुंबई, अहमदनगर आणि विदर्भात मोठी ताकद असून त्या बाबत चर्चा करून जागा मागणार असल्याचेही केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले.
पिंपरीत विविध कार्यक्रमानिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहिले होते. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. या वेळी आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, कुणाल वव्हाळकर, सुधाकर वारभुवन, अजिज शेख आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, सध्या आम्ही पक्ष बांधणीवर भर दिला आहे. राज्यभरात शिबिरे आयोजित करून पक्षवाढीसाठी प्रयत्न चालू केले आहेत. मुंबई, सातारा, यवतमाळ या ठिकाणी पक्षाने शिबिरे आयोजित केली आहेत. नागालॅंडमध्ये पक्षाचे दोन आमदार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात देखील मुंबई आणि विदर्भामध्ये पक्षाची मोठी ताकद आहे. या बरोबरच यापूर्वी मी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार होतो. त्या ठिकाणीही पक्षाची मोठी ताकद आहे. मी तिथून लढावे की नाही हे चर्चा करून ठरविणार आहे. मला ती जागा सोडलीच तर केंद्रात मंत्री असल्यामुळे त्याचा फायदा अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना होईल, असे मंत्री आठवले म्हणाले.
मंत्री आठवले म्हणाले की, केंद्र सरकारच्या सबका साथ सबका विकासाला आरपीआयचा पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात आंबेडकरी समुदायाचे प्रश्न सुटले. देशाचे संविधान बदलण्याची काही लोक अफवा पसरवत आहेत. तसे काही होणार नाही. मणिपूरमध्ये शांतता रहावी, हीच केंद्राची ईच्छा आहे. दोन्ही समुदायाच्या लोकांना शांत राहण्याचे आवाहन मोदी सरकारने केले आहे. संसदेच्या अधिवेशनात यावर चर्चा करण्यात येणार होती. मात्र विरोधकांनी जाणिवपुर्वक गोंधळ घालून ही चर्चा बंद पाडल्याचे आठवले म्हणाले.
महापालिकेला 15 जागा मागणार
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहेत. डिसेंबर किंवा जानेवारी दरम्यान लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत आरपीआयच्या वतीने 15 जागांवर दावा केला जाणार आहे. चर्चेनुसार किती जागांवर लढायचे ते ठरविले जाईल, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.