नगर -करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून बंद आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्हॅन, रिक्षाचालकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे नव्या वर्षात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांना करांत सवलत द्यावी, अशी मागणी वाहतूक सेनेचे शहर प्रमुख संजय आव्हाड यांनी केली आहे.
या संदर्भातील मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आले असून, त्याची प्रत आज जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली. महसूलतर्फे नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
माजी महापौर भगवान फुलसौंदर व अभिषेक कळमकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, ऍड. विनायक सांगळे, अशोक गायकवाड यांच्यासह वाहतूक सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी राज्य सरकारने तीन महिन्यापूर्वी शाळा व महाविद्यालये बंद केली. तेव्हापासून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.