नगर -दीर्घ प्रतीक्षेनंतर दिवंगत नेते दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीने अखेर मार्केटयार्डमधील फळे, फुले व भाजीपाला मार्केट सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार सुरू झालेल्या बाजारात करोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी आवश्यक असलेले फिजिकल डिस्टन्स व मास्कचा वापर व्यापाऱ्यांनी बंधनकारक केला आहे. मार्केटमध्ये येणारे शेतकरी व अन्य ठोक खरेदीदारांनाही या नियमाची सक्ती केली असल्याची माहिती अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे यांनी दिली.
करोनाबाधित रुग्ण या परिसरात आढळ्याने हा परिसर कंन्टेन्मेंट झोन म्हणून यापूर्वी घोषित करण्यात आला होता. त्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 11 जूनला येथे भाजीपाला व फळ मार्केट सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. आमदार संग्राम जगताप यांनी व्यापाऱ्यांची बाजू जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व कृषी उत्प्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडली होती. त्यानुसार ही परवानगी मिळाली असल्याचे अध्यक्ष अशोक लाटे, दिवंगत नेते दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष सुर्यवंशी व नंदकिशोर शिकरे यांनी सांगितले.
शनिवारी (ता. 13) बाजार समितीच्या आवारात बाजार सुरु करण्यासाठीच्या नियमांचे नियोजन करुन प्रत्यक्ष बाजारास प्रारंभ करण्यात आला. पहाटे 3 ते 6 या वेळेत फळे, फुले व भाजीपाला मार्केट भरविण्यात येत आहे. शेतकरी, ठोक खरेदीदार यांना खरेदी-विक्रीसाठी मार्केटयार्डमध्ये येण्याचा मार्ग खुला असल्याचे भाजीपाला, फळफळावळ आडते असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.
भाजीपाला मार्केट बंद असल्याने तेथील व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचेही नुकसान होत असल्याचे गाऱ्हाणे व्यापाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या पुढ्यात मांडले होते. त्यानंतर आमदार जगताप यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिव यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न सोडविल्याचे अध्यक्ष अशोक लाटे, संतोष सुर्यवंशी, नंदकिशोर शिकरे यांनी सांगितले.