आरेमधील वृक्षतोडीवर अनेकांनी टीका केली आहे. पण वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या तरुणांना हे कळले आहे की, तापमान वाढत आहे आणि ही त्यांची पिढी, पृथ्वीवरची मानवजातीची शेवटची पिढी ठरणार आहे. पुरते आयुष्यही त्यांना मिळणार नाही, याची जाणीव त्यांना झाली आहे. या तरुणांना समजते की, आता प्रेक्षकाच्या भूमिकेत राहता येणार नाही. टीका करणारांनी वास्तव समजून घेतले तर त्यांना कळेल की, हे तरुण टीका करणाऱ्यांनाही वाचवू इच्छितात. त्यांना सांगायचे आहे की, अंदाधुंद विकासाचे युग आता संपले आहे.
आरेतील जंगल वाचवण्यासाठी सरसावलेल्या तरुणांवर हीन पातळीवर जाऊन टीका करणे काही जणांकडून चालू आहे. त्यांच्या मते, रॉयल पाम झाले, फिल्म सिटी झाली, अनेक रस्ते झाले, पवई तलावात ‘रेनेसॉं’ हॉटेल व शेजारी डोंगर तोडून “हिरानंदानी संकुल’ झाले, तेव्हा हे तरुण कुठे होते? आता हे सामान्य आकलन आहे की, हे विशीतील तरुण त्यावेळी एकतर जन्माला आले नव्हते किंवा दोन-पाच वर्षे वयाचे होते. त्यांनी त्यावेळी काही करण्याची अपेक्षा आहे काय? आणि या तरुणांना नावे ठेवणाऱ्यांनो, तुम्ही तेव्हा काय करत होता? तेव्हाही तुम्ही या विनाशाची बाजू घेत होता आणि आताही घेत आहात.
मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर यामुळेच ठरले आहे. ते ‘गॅस चेंबर’ बनले आहे. गेल्या 24 वर्षांत गाजावाजा करून आणलेल्या सर्व वाहतूक योजना अयशस्वी ठरल्या आहेत. वाहतूक अराजक तयार झाले ते, तरुणांवर आक्षेप घेणाऱ्या या अज्ञानी व लबाड निष्क्रियतेमुळे. स्वतः कशात भाग घ्यायचा नाही व जे करतात त्यांना नावे ठेवायची? इतर तरुणाई दिशाहीन होऊन, टोळ्या बनून, राजकीय पक्षांच्या मागे झुंडीने लागली असताना, झाडांवर प्रेम करणारे, शुद्ध हवा हवी, अशी स्पष्ट भूमिका घेणारे, वाढत्या उष्णतेने चिंतित होणारे हे कॉलेज वयाचे तरुण, देशासाठी आशेचे चिन्ह आहेत.
बहुतांश जनता निराश आहे. मला काय त्याचे, माझ्यापर्यंत तर पोहोचले नाही ना, अशी स्वयंकेंद्री स्वार्थी भूमिका बव्हंशी समाज घेताना दिसतो. अशावेळी इतर मानव व सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी उतरणे हे खऱ्या भारतीयत्वाचे लक्षण आहे.
हजारो, लाखो वर्षांच्या तुलनेत उच्चतम तापमान युरोपात जागोजागी 35 ते 40 अंश सेल्सियसने वाढल्याने, जगात प्रथम आगगाडीसह स्वयंचलित यंत्रे आणणाऱ्या युरोपातील मुले म्हणत आहेत की, ज्या मानवी व्यवस्थेत सामील होण्यासाठी आम्हाला शिक्षण दिले जात आहे, ती व्यवस्था आम्हाला नष्ट करणार आहे, मग आम्ही शाळा, महाविद्यालयात का जावे?
आरेतील झाडे वाचवण्यासाठी मध्यरात्री झुंजणाऱ्या तरुणांपैकी अनेकांना हे माहीत आहे की, सध्या हयात असलेल्या माणसांपैकी दर पाच माणसांत एकाला कॅन्सर होणार आहे व पुढील पाच वर्षांत हे प्रमाण तीन माणसांत एक असे होणार आहे, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. याला कारण, वाढता ‘कार्बन डाय ऑक्साईड वायू’ व विषारी प्रदूषण आहे. प्राणवायू सतत घटत असताना तो देणारी झाडे वाचवणे म्हणजे स्वतःला वाचवणे आहे, हेही मुले जाणतात.
या मुलांना हे कळले आहे की, तापमान वाढत आहे आणि ही त्यांची पिढी, पृथ्वीवरची मानवजातीची शेवटची पिढी ठरणार आहे. पुरते आयुष्यही त्यांना मिळणार नाही, याची जाणीव त्यांना झाली आहे. या गोष्टी आमच्या राजकारण्यांना आणि न्यायालयांनाही माहीत नसाव्यात, याला तरुणांचा आक्षेप आहे. पक्षीय राजकारण करण्यात त्यांना रस नाही. त्यांना माहीत आहे की, पवई तलावातील ‘रेनेसॉं’त राजकीय पक्षांची चिंतन शिबिरे होतात आणि मेट्रो 3 भुयारी रेल्वे हा विध्वंसक प्रकल्प सन 2011 मध्ये मागच्या सरकारच्या काळात आला. या तरुणांना समजते की, आता प्रेक्षकाच्या भूमिकेत राहता येणार नाही. टीका करणारांनी वास्तव समजून घेतले तर त्यांना कळेल की, हे तरुण टीका करणाऱ्यांनाही वाचवू इच्छितात. त्यांना सांगायचे आहे की, अंदाधुंद विकासाचे युग आता संपले आहे.
रस्ते व रेल्वे अपघातात रोज मरणाऱ्या माणसांकडे बोट दाखवून या तरुणांना, तुम्ही याला जबाबदार ठराल, अशी भीती दाखवली जाते. हे टीकाकारांचे अज्ञान तरी आहे किंवा शुद्ध कांगावा आहे. प्रकल्पाचे अधिकारी जेव्हा असा आरोप करतात तेव्हा तर या ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ठरतात. या माणसांच्या मरणास, वाहतुकीच्या योजनांनी सुरुवात करू नये म्हणून बजावले असतानाही केलेल्या, मोटारींना प्रोत्साहन देणाऱ्या, 55 उड्डाणपूलांपासून, पुढील राजवटीतील 42 उड्डाणपूल, वांद्रे- वरळी सी लिंक, नंतर मग सार्वजनिक वाहतुकीचे नाव घेऊन दिशाभूल करून केलेले मोनोरेल व मेट्रो, या योजना जबाबदार आहेत.
हे सर्व प्रकल्प, मुंबईची दाटी कमी करणे व वाहतुकीत बेस्ट बसला लोकसंख्येतील वाढीप्रमाणे वाढवत नेणे, रेल्वेला अधिक सक्षम करणे, या अधिकृत धोरणाच्या विरुद्ध होत्या. त्या, धोरणाचा भाग असल्याचे भासवणे, ही जनतेची व न्यायालयांचीही फसवणूक होती. इंधन, बांधकाम, वाहन व ऊर्जानिर्मिती उद्योग यांच्या जगभरच्या षडयंत्राचा हा भाग आहे. यासाठी माध्यमांना हाताशी धरून पायाभूत संरचना वाढ हवी असा घोषा लावला जातो. लुटुपुटूच्या परिषदा परिसंवाद घेतले जातात. कोणतीही स्पर्धा नसताना प्रकल्पांच्या पान पानभर जाहिराती येतात. पेरलेले समर्थक पोपटासारखे वाहवा करू लागतात. प्रसंगी हिंसकही होतात. विरोधकांची निंदा केली जाते. त्यांना अतिरेकी ठरवले जाते.
एनरॉनचे प्रकरण यादृष्टीने उदबोधक आहे. या कंपनीची अमेरिकन कॉंग्रेसतर्फे चौकशी झाली. प्रमुख अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या चौकशीत, कंपनीने भारतात प्रकल्प राबवण्यासाठी तेव्हा 90 कोटी रुपयांची लाच, ‘शिक्षित करणे’ हा धूळफेक करणारा शब्दप्रयोग वापरून राजकारणी, नोकरशाही, न्यायव्यवस्था, माध्यमे आणि इतर घटकांत दिली असे आढळले.
जगाचा स्फोटक तापमानवाढीकडचा प्रवास सन 1990 नंतर वेगाने झाला. याला लालसेला स्वैर सोडणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी केलेले जागतिकीकरण कारण आहे. “आता विश्वात्मके देवे’ म्हणून प्रार्थना करून ज्ञानेश्वरांनी मागितलेले विश्वाच्या हिताचे पसायदान हे भारतीय संस्कृतीचे खरे वैश्विकरण होते. हजारो वर्षे निसर्गाशी तादात्म्य पावून भारतीय कृषक ते जगले. तो खरा शाश्वत विकास होता. आपल्या देशात, ब्रिटिशांनी, गुलामी राबवण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांना अमर्याद अधिकार देऊन नोकरशाहीची तयार केलेली पोलादी चौकट यात फार सक्रिय असते. काही अपवाद वगळता आजही ती तीच भूमिका करत आहे. यांना तापमानवाढ अपरिवर्तनीय होणे वगैरे गोष्टींशी काही देणे घेणे नसते. विकास, जीडीपी, आर्थिक वाढ असे परवलीचे शब्द ते सतत वापरतात. या जाळ्यात मुंबईला फसवले गेले व यात यंत्रणांचे प्रमुख असलेले आय ए एस अधिकारी कळीचे काम करतात. सन 1990 नंतर तेच देश चालवत आहेत. हा प्रकल्प आश्वासन दिल्या गेलेल्या प्रत्येक मुद्द्यावर अयशस्वी व खोटा कसा ठरतो हे सिद्ध करू.
आता संबंधितांनी हे तरूण, स्वतःला व्यक्त करू न शकणाऱ्या झाडांच्या बाजूने का उभे आहेत हे, सर्व पूर्वग्रह व स्वतःच्या महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून समजून घ्यावे. पुढील हानी टाळण्यासाठी एका विध्वंसक, धोकादायक, अनावश्यक व पूर्ण झाला तर भूयारात शेकडो- हजारो मुंबईकरांना मारणार असलेल्या, “मौत का कुवा’ ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी, संवेदनशील तरुणांच्या व प्रकल्पाने आधीच त्रासलेल्या, सोशिक जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. माणसांचे, झाडांचे, पशुपक्ष्यांचे शिव्याशाप घेऊ नये व हा प्रकल्प ताबडतोब रद्द करावा, अशीच अपेक्षा आहे.
ऍड. गिरीश राऊत
भारतीय पृथ्वीरक्षण चळवळ