पावसातच प्रचाराचे नियोजन
परतीच्या पावसाने साताऱ्याचा तापलेला राजकीय पारा गारठवला आहे. जिल्हयाच्या पश्चिम भागात पावसाने ठाणं मांडल्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या दिवसाचे प्रचाराचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. तशाही पावसात नेत्यांचा गारठलेला प्रचार सुरूच राहिला. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सोमवारी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सोमवारी जिल्हयात 2277 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाच्या पेट्या व कर्मचाऱ्यांसाठी 475 बसेसची सोय जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केली आहे.
सातारा – शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागांत परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी परिसरात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. माण, खटाव तालुक्यातही काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सातारा शहरातही शनिवारी पावसाचा जोर वाढला. दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे शहरातील मुख्य रस्तेही ओस दिसत होते.
शनिवारी सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत महाबळेश्वरला 216.4 मिलिमीटर तर जावलीत 138 मिलीमीटर व साताऱ्यात 74 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीे. वाईच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे .धोम धरणाच्या दुतर्फा डोंगराकडेला अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक पाणी साठल्याने विस्कळीत झाली.
दमदार पावसामुळे यवतेश्वर घाटातून पाण्याचे लोट बोगदा चौकात येऊ लागले, बरीच मातीसुद्धा वाहून आली. कास रस्त्यावर यवतेश्वर घाट ते आटाळी या दरम्यान जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरू होता. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. अनावळे ते पारंबे फाटा दरम्यान वाऱ्यामुळे ठिकठिकाणी फांद्या तुटून तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर
आली. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
मेढा येथील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मेढा- महाबळेश्वर रस्त्यावर वाहतुक पावसामुळे मंद गतीने सुरू होती. केळघर घाटातील काळ्या कड्यातील संरक्षण भिंतीला तडे गेले असून पावसाचा जोर वाढल्याने काही ठिकाणी भिंत धोकादायक झाली आहे. जावळीत गेले दोन दिवस होत असलेल्या पावसाने सारेच जनजीवन विस्कळीत झाले आहे .